जागोजागी लोकल खोळंबल्या, मुंबई लोकलची सेवा विस्कळीत

पश्चिम रेल्वेवरील जलद मार्गावरील रेल्वे सेवा खोळंबली आहे. त्यामुळे माटुंगा रोड ते वांद्रे स्थानकादरम्यान अनेक लोकल थांबलेल्या पाहायला मिळत आहे.

जागोजागी लोकल खोळंबल्या, मुंबई लोकलची सेवा विस्कळीत
railway local
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 04, 2025 | 4:56 PM

Mumbai Local Train Update : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम रेल्वेचा मोठा खोळंबा होत आहे. त्यातच आता पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या अर्धा तासांपासून माटुंगा रोड ते वांद्रे स्थानकादरम्यान अनेक लोकल थांबलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १५ ते २० मिनिटांपासून मुंबईतील पश्चिम उपनगरीय रेल्वे वाहतूक उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेवर काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने जलद मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत. अनेक प्रवाशांनी याबद्दल ट्वीटरवर तक्रार नोंदवताना दिसत आहेत.

साधारण ३० ते ३५ मिनिटे लोकल उशीराने

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि विरारकडे जाणाऱ्या दोन्हीही दिशेकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला आहे. एका रेल्वे प्रवाशाने याबद्दल ट्वीटरवर तक्रार केली आहे. गेल्या अर्धा तासांपासून अनेक लोकल गाड्या या बोरिवली, विरार, वसई, वांद्रे, जोगेश्वरी, दादर यांसह विविध ठिकाणी थांबल्या आहेत. या ट्रेन साधारण ३० ते ३५ मिनिटे उशीराने धावत आहेत. विशेष म्हणजे अनेक एसी लोकलही उशीराने सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे लोकल उशिराने धावत आहेत. किती वाईट सेवा आहे, असा प्रश्न एका प्रवाशाने विचारला आहे. त्यावर पश्चिम रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.

पश्चिम रेल्वेने दिली माहिती

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ट्रॅक देखभालीचे काम सुरु आहे. त्यामुळे ट्रेनच्या वेगावर निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे अनेक ट्रेन या उशीराने धावत आहे. तुम्हाला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून खेद व्यक्त करत आहोत, असे पश्चिम रेल्वे सांगितले आहे.

प्रवाशांना विनाकारण त्रास

दरम्यान रेल्वेच्या या कारभारामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक प्रवाशी संतप्त झाले आहेत. काही प्रवाशांनी पश्चिम रेल्वचेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पश्चिम रेल्वे उशीरा धावत असल्याने आता अनेकांना घरी पोहोचायला लेट होणार असल्याचे दिसत आहे.