मी हाय.. बिनधास्त मासे काप, मी उभी आहे; महापौर रितू तावडे कोळिणींच्या पाठी खंबीर, उबाठालाही डिवचलं
मुंबईतील मासळी बाजारात मासे कापण्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. बाजारात मासे कापण्यावर महापालिकेनं बंदी घातल्याचं वृत्त सोशल मीडियावर पसरलं. त्यावर आता महापौर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेनं निर्बंध लादल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. मासळी विक्रेत्या महिला, कोळी बांधव आक्रमक झाले असतानाच विरोधी पक्षांनाही सत्ताधाऱ्यांवर कडवी टीका केली. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलं नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी कोळी भगिनी आणि बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा, असा खंबीर पाठिंबा दिला. “ही कोळ्यांची मुंबई आहे. उबाठाकडे आता काहीच विषय राहिले नाहीत. त्यामुळे षडयंत्र रचून रील्स व्हायरल केले जात आहेत. उलट आम्ही कोळी बांधवांसाठी मासळी बाजार बांधून देणार आहोत”, असं त्या म्हणाल्या.
काय म्हणाल्या रितू तावडे?
“मुंबईचे मूळ नागरिक म्हणून कोळी समाजाची ओळख आहे. मुंबईची महापौर म्हणून मी आणि महानगरपालिका प्रशासन त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मी बोलते, बिनधास्त मासे कापा, मी इथे उभी आहे. मासा कसा घरी न्यावा, हे ग्राहकांवर अवलंबून असतं. मासे कापण्याच्या बंदीबाबतची बातमी फक्त ‘सामना’ वृत्तपत्रात आली आहे, इतर कुठेही नाही. मुंबई कोळ्यांची आहे, कोणाच्या बापाची नाही. कोळी बांधवांच्या पाठिशी शिंदे साहेबदेखील आहेत. कोळी भगिनींना आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना आम्ही आईस बॉक्ससुद्धा देतोय. कोळी बांधवांच्या साधेपणाचा फायदा घेत उबाठा गट अफवा पसरवत आहेत”, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.
मुंबईतील वाकोला इथल्या मासळी बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर मुंबई महानगरपालिकेनं बंदी घातल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. मासे कापल्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची अफवा पसरली होती. यामुळे मासळी व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली होती. त्यानंतर विरोधकांनी देखील आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दरम्यान मुंबईमधील कोणत्याही मासळी बाजारात मासळी कापण्यावर निर्बंध घालण्यात आलेले नाहीत, असं महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केलं.