
गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे या सतत काही ना काही कारणांनी चर्चेत आहेत. कधी गाडीवर लावलेला लाल दिवा, तर कधी कोट्यावधींचं घड्याळ यामुळे त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. त्यातच आता महापौर रितू तावडे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौरांनी स्वतः महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली होती, ज्याला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या नव्या निर्णयानुसार आता महापौरांच्या सुरक्षेसाठी तीन शिफ्टमध्ये एकूण ६ सुरक्षा रक्षक तैनात राहणार आहेत.
मुंबईच्या महापौरांना आतापर्यंतच्या नियमानुसार प्रत्येक शिफ्टला एक याप्रमाणे एकूण तीन सुरक्षा रक्षक दिले जात असत. मात्र, रितू तावडे यांच्या बाबतीत हा नियम बदलण्यात आला आहे. आता त्यांना प्रत्येक शिफ्टला दोन सुरक्षा रक्षक दिले जाणार आहे. त्यामुळे दिवसाच्या २४ तासांत एकूण ६ अंगरक्षक त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळतील. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महापौरांना इतकी कडेकोट सुरक्षा पुरवण्यात येत असल्याचे बोललं जात आहे.
महापौर रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून मुंबईच्या विविध नागरी समस्यांवर थेट मैदानात उतरून काम करण्यास सुरुवात केली आहे. रस्ते, पाणी आणि स्वच्छता यांसारख्या मुद्द्यांवर त्या स्वतः वस्त्यांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये जाऊन पाहणी करत आहेत. अशा वेळी सामान्य नागरिकांची मोठी गर्दी त्यांच्याभोवती जमते. ही वाढती गर्दी आणि महापौरांची सुरक्षितता लक्षात घेता जुनी सुरक्षा यंत्रणा अपुरी पडत असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे रितू तावडे यांनी तातडीने अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रितू तावडे महापौर झाल्यापासून अत्यंत सक्रियपणे कामाला सुरुवात केली आहे. त्या केवळ कार्यालयात न बसता मुंबईच्या विविध भागांत प्रत्यक्ष जाऊन भेटीगाठी घेत आहेत. विशेषतः अत्यंत गजबजलेल्या आणि गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या दौऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या जनसंपर्कादरम्यान कोणतीही अघटित घटना घडू नये आणि महापौरांची सुरक्षा अबाधित राहावी, या उद्देशाने ही खबरदारी घेण्यात आली आहे.