14 हजार 900 कॅप्सूल लोकांनी खाल्ल्या असत्या तर… मुंबईत काय घडलं असतं? पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
Poison Capsules Case : मुंबईत जेजे आणि भायखळा परिसरातून मोहरमची मिरवणूक जात असताना एक व्यक्ती लोकांना कॅप्सूल देत असल्याचे समोर आले आहे. आता याबाबत पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

मुंबई पोलिसांनी मोहरम मिरवणुकीदरम्यान कथितरीत्या विषारी कॅप्सूल वाटप करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात फैयाज प्रेमजी नावाच्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वेदनांपासून आराम मिळेल असं म्हणत लोकांना कॅप्सूल वाटत आणि विकत होता. जेजे आणि भायखळा परिसरातून मोहरमची मिरवणूक जात असताना आरोपी लोकांना हे कॅप्सूल वितरित करत असल्याचे आढळले आहे. आता या कॅप्सूल्सबाबत पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे.
पोलिसांनी काय म्हटले?
या घटनेबाबत बोलताना झोन 1 मुंबईचे पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी म्हटले की, ‘काल रात्री भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुस्लिम समुदयाच्या मोहरमच्या मिरवणुकीत एक इसम पेन रिलीफ सारख्या दिसणाऱ्या कॅप्सूल मोफत वाटप करत होता. त्यावर पोलिसांना संशय निर्माण झाला आणि त्याच्याकडे कुठलीही परवानगी नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडील कॅप्सूल्स जप्त करुन त्याची चौकशी सुरू केली.
संशयीताची परदेशवारी
चौकशी सुरू असताना सलमान सय्यद नावाच्या व्यक्तीची कॅप्सूल खाऊन तब्बेत बिघडली असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचा संशय अधिक वाढला आणि त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने धक्कादायक माहिती दिली. ताब्यात घेतलेल्या इसमाच नाव फय्याज प्रेमजी आहे, तो पुण्याच्या विमाननगर याठिकाणी राहतो. त्याने BBA केलेलं आहे, तो इराण आणि इराकला जाऊन आलेला आहे.
14 हजार 900 कॅप्सूल जप्त
फय्याज निसार प्रेमजीची अधिक चौकशी केली असता असे समजले की, मोहरमच्या मिरवणुकीत मोफत कॅप्सूल वाटप करुन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा त्याचा उद्देश होता. वाटप करत असलेल्या कॅप्सूल मध्ये त्याने झिंक फॉसफईड नावाचा विषारी पदार्थ मिसळला होता. त्याच्याकडून 14 हजार 900 कॅप्सूल पोलिसांनी जप्त केल्या आहेत, एका कॅप्सूल मध्ये तो एक ग्रॅम झिंक फॉसफईड टाकत होता.
मोठा धोका टळला
पुढे बोलताना पोलिसांनी सांगितले की, ’30 हजार रिकामी कॅप्सूलची त्याने ऑर्डर केली होती, 50 किलो झिंक फॉसफईडची ऑर्डर केली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला आहे. त्याची सखोल चौकशी सुरु आहे. घटनेचा तपास सुरु आहे, आणखीन काही माहिती लवकरच समोर येईल. दरम्यान, जर ही कॅप्सूल्स 14 हजार 900 लोकांनी खाल्ल्या असत्या तर त्यांचीही तब्ब्येत खराब होऊन काही बरं वाईट झालं असतं अशी माहिती समोर आली आहे.