मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळीत दुर्घटना, मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

| Updated on: Jul 18, 2021 | 12:50 PM

मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शोक व्यक्त केला.

मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळीत दुर्घटना, मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
Follow us on

मुंबई : मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, असं त्यांनी जाहीर केलं.

पालिका आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली बचाव कार्याची माहिती

मुंबईत शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. शहरातल्या विविध भागांत पावसाने रौद्ररुप दाखवलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेतायत

मुंबईत रात्रभर पाऊस सुरु असून मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत आहेत. आजही पाउस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरु ठेवावे व मदत पोहचवावी असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे. कोविड संसर्ग लक्षात घेऊन जम्बो केंद्रामधील रुग्ण तसेच इतर साधन सामुग्री यांची काळजी घ्यावी व सावध राहण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी पालिकेस सांगितले आहे.

पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित करावी

पावसामुळे जिथे जिथे पाणी साचले आहे त्याठिकाणी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित करावी, रस्ते मोकळे करावेत , वाहतुकीवर परिणाम झालेला आहे मात्र लवकरात लवकर ती सुरळीत होईल असे पाहावे, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील रेल्वे वाहतूक कशी पूर्ववत होईल हे बघण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला दिल्या.

केंद्राचीही 2 लाखांची मदत

मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Rain Wall Collapse in Chembur Vikroli thackeray Government help 5 Lakh Relatives of dead)

हे ही वाचा :

Mumbai Rains | चेंबूरमध्ये भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू, आदित्य ठाकरे घटनास्थळी दाखल