Mumbai Rains: मुंबईत पावसाचं धुमशान; पालिकेने 10 तासांत उपसले तब्बल 442 कोटी लिटर पाणी!

| Updated on: Jul 18, 2021 | 6:22 PM

काल संध्याकाळपासूनच पावसाने मुंबईला झोडपून काढलं आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूकीचा खोळंबा झाला. (heavy rain in Mumbai)

Mumbai Rains: मुंबईत पावसाचं धुमशान; पालिकेने 10 तासांत उपसले तब्बल 442 कोटी लिटर पाणी!
Mumbai Rains
Follow us on

मुंबई: काल संध्याकाळपासूनच पावसाने मुंबईला झोडपून काढलं आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूकीचा खोळंबा झाला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. तर सोसायट्यांभोवतीही पाणीच पाणी झाले. मुंबईत अवघ्या पाच तासात 200 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे महापालिकेनेही युद्धपातळीवर या पाण्याचा निचरा केला. पालिकेने गेल्या दहा तासात मुंबईतील 442 कोटी लिटर पाण्याचा उपसा केला आहे. (Mumbai Rains: 6 pumping stations pumped 442 crore liters water 10 hours)

महापालिकेच्या सहा उदंचन केंद्रांमध्ये (पंपिंग स्टेशन) मोठ्या क्षमतेचे एकूण 43 उदंचन संच अर्थात ‘पंप’ कार्यरत आहेत. 17 जुलै ‌रोजी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचे पाणी खेचून ते समुद्रात टाकण्याचे काम महापालिकेच्या उदंचन केंद्राद्वारे अव्याहतपणे करण्यात आले. या साधारणपणे 10 तासांच्या कालावधी दरम्यान 442.35 कोटी लिटर (4423.50 दशलक्ष लीटर) इतके पाणी पंपाद्वारे खेचून ते समुद्रामध्ये टाकण्यात आले आहे, ज्यामुळे मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मोठी मदत झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

सहा उदंचन केंद्र

महापालिका क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी हाजीअली, लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड बंदर (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), ईर्ला (जुहू) आणि गजधरबंध (सांताक्रुज पश्चिम) याठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे 6 उदंचन केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व केंद्रांमध्ये एकूण 43 पंप आहेत. या प्रत्येक पंपाची क्षमता ही प्रत्येक सेकंदाला 6 हजार लिटर पाण्याचा निचरा करण्याची आहे. याचाच अर्थ 6 उदंचन केंद्रांमधील 43 पंपांची पाणी उपसा करण्याची अधिकतम क्षमता ही प्रत्येक सेकंदाला 2 लाख 58 हजार लिटर एवढी आहे. तथापि, पावसाचे व उदंचन केंद्रांमध्ये वाहून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन हे पंप कार्यरत होतात, अशी माहिती वेलरासू यांनी दिली.

वरळीच्या पंपिंग स्टेशनमधून सर्वाधिक उपसा

शनिवारी 17 जुलै रोजी रात्री 11 ते रविवार, 18 जुलै रोजी सकाळी 9 पर्यंतच्या म्हणजेच सुमारे 10 तासांच्या कालावधीदरम्यान 6 उदंचन केंद्रांद्वारे एकूण 442.35 कोटी लिटर (4423.50 दशलक्ष लिटर) पावसाच्या पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. या अंतर्गत हाजीअली उदंचन केंद्राद्वारे 74.56 कोटी लिटर (745.56 दशलक्ष लिटर), लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राद्वारे 102.98 कोटी लिटर (1029.78 दशलक्ष लिटर), क्लीव्हलॅंड उदंचन केंद्राद्वारे 68.94कोटी लिटर (689.40 दशलक्ष लिटर), ब्रिटानिया उदंचन केंद्राद्वारे 41.79 कोटी लिटर (417.96) दशलक्ष लिटर, इर्ला उदंचन केंद्राद्वारे 95.73 कोटी लिटर (957.24 दशलक्ष लिटर आणि गज़धरबंध उदंचन केंद्राद्वारे 58.36 कोटी लिटर (583.56 दशलक्ष लिटर) इतक्या मोठ्या प्रमाणातील पावसाच्या पाण्याचा निचरा या उदंचन केंद्राद्वारे करण्यात आला आहे, अशीही माहितीही त्यांनी दिली. (Mumbai Rains: 6 pumping stations pumped 442 crore liters water 10 hours)

 

संबंधित बातम्या:

Mumbai Rains : मुंबईवरून सुटणाऱ्या 9 प्रवासी रेल्वेगाड्या रद्द

Monsoon Alert : पुढचे पाच दिवस कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वाचे, IMD कडून रेड, ऑरेंज ॲलर्ट जारी

स्मशानभूमींसाठी 250 कर्मचारी दाखवले, पण प्रत्यक्षात प्रत्येकी एकच, ठेकेदारांकडून स्मशानातही ‘लोणी’ खाण्याचा प्रताप?

(Mumbai Rains: 6 pumping stations pumped 442 crore liters water 10 hours)