बकऱ्याचे काळीज, दारु अन् स्मशानातील…; मुंबईत गार्डनमध्ये भोंदू बाबाचा अघोरी खेळ
मुंबईतील मालाड परिसरात उपचारांच्या नावाखाली अघोरी पूजा आणि जादूटोणा करणाऱ्या रिदम पांचाळ या भोंदू बाबाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यात एकीकडे नाशिकमधील अशोक खरात प्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत. त्यानंतर आता मुंबईतही अशाप्रकारे भोंदूबाबा सक्रीय असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबईतील मालाड पूर्व परिसरात राहणाऱ्या एका भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. रिदम पांचाळ (३७) असे या भोंदू बाबाचे नाव आहे. हा बाबा उपचाराच्या नावाखाली अघोरी कृत्य आणि जादूटोणा करून लोकांची दिशाभूल करायचा. त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रिदम पांचाळ हा गेल्या दोन वर्षांपासून रविवार आणि गुरुवार या दिवशी स्वतःच्या अंगात देवी येत असल्याचा दावा करून अघोरी पूजा करत असे. भूत उतरवण्याच्या नावाखाली तो रात्री ६-७ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत अघोरी विधी करायचा. विशेष म्हणजे, ४ एप्रिल रोजी त्याने महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांच्या उपस्थितीत उघडपणे जादूटोण्याचा प्रयोग केला होता.
हा भोंदू बाबा उपचारांच्या नावाखाली नागरिकांकडून अत्यंत संशयास्पद साहित्य मागवत असे. ज्यात बकऱ्याचे काळीज (कलेजा), स्मशानातील राख, लिंबू, टाचण्या, दारूची बाटली, सिगारेट, काळे आणि लाल कापड, कुंकू हे साहित्य मागवायचा. त्यानंतर ते चार रस्त्यांच्या मध्यभागी ठेवण्यास सांगून तो लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घ्यायचा, अशी माहिती समोर आली आहे.
रिदम पांचाळला अटक
स्थानिक रहिवासी या भोंदू बाबाच्या कृत्यांमुळे त्रस्त झाले होते. साधारण ६५ ते ७० स्थानिकांनी एकत्र येत स्वाक्षरी केलेल्या तक्रारीसह अनेक फोटो आणि व्हिडीओ पुरावे म्हणून दिंडोशी पोलिसांकडे सादर केले. याप्रकरणी अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रिदम पांचाळला ताब्यात घेत त्याला अटक केली. आज दुपारी त्याला बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान या भोंदू बाबाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण कोणताही जादूटोणा करत नसून, केवळ लोकांची सेवा आणि पूजा करत असल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच आपण यातून कोणताही आर्थिक मोबदला घेत नाही, असेही त्याने म्हटले. दरम्यान मुंबईसारख्या सुशिक्षित आणि प्रगत शहरात सुशिक्षित लोक अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. आता दिंडोशी पोलीस या प्रकरणात पुढील काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.