पांढऱ्या पट्टीचे सत्र सुरुच! दादरनंतर चर्नीरोडमध्ये नागरिक आक्रमक, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पांढऱ्या पट्टीचा वाद चांगलाच तापला आहे. इन्फ्लूएंसर प्रसाद वेदपाठकने घाटकोपर येथील त्याच्या सोसायटीमधील पांढऱ्या पट्ट्यांचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर दादारमध्ये देखील अशाच पट्ट्या असल्याचे पाहायला मिळाले. आता चर्नीरोड येथे देखील मध्यरात्री मोठी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद अधिक तीव्र होत चालला आहे. यूट्यूबर आणि इन्फ्लूएंसर प्रसाद वेदपाठकने त्याच्या सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीचा व्हिडीओ शेअर केला होता. कोणाच्याही परवानगी शिवाय सोसायटीमध्ये जैन धर्मियांसाठी ही पांढरी पट्टी मारण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर हा पांढऱ्या पट्टीचा वाद चांगलाच पेटला. घाटकोपरनंतर दादरमध्येही अशा काही पट्ट्या आढळल्या होत्या. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावर संताप व्यक्त केला होता. आता दादार पाठोपाठ दक्षिण मुंबईतील चर्नी रोड परिसरात देखील अशा पट्ट्या पाहायला मिळाल्या.
चर्नी रोडवरील फूटपाथ आणि रस्त्यांवर रात्रीच्या वेळी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर मध्यरात्री काळा रंग फासण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे गिरगाव-चर्नी रोड परिसरात तणाव वाढला आहे.
नेमका वाद काय आहे?
मुंबईच्या विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यांच्या कडेला आणि फूटपाथवर पांढऱ्या पट्ट्या मारल्या जात असल्याचे दिसून येत आहे. जैन समुदायाकडून याचा दावा केला जातो की, ही पट्टी पायाखाली कीटक-किडे चिरडले जाऊ नयेत म्हणून धार्मिक कारणास्तव मारली जाते. मात्र, सार्वजनिक रस्ते आणि फूटपाथ धार्मिक कारणांसाठी अशाप्रकारे चिन्हांकित किंवा खासगीकरण करता येत नाही, अशी विरोधकांची भूमिका आहे. शनिवारी दादरमध्ये अशाच पांढऱ्या पट्ट्या मारल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत याला ‘सांस्कृतिक दहशतवाद’ असे म्हटले होते.
चर्नी रोडवर काय घडले?
चर्नी रोड परिसरातील बेने डोसा रेस्टॉरंटसमोरच्या फूटपाथवर पांढऱ्या पट्ट्या आढळल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. ‘आम्ही गिरगावकर’ या स्थानिक संघटनेने याला विरोध दर्शवला. संघटनेच्या कार्यकर्ते आणि स्थानिक गिरगावकरांनी रात्रीच्या सुमारास या पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग फासला. या घटनेमुळे परिसरात चर्चा आणि तणाव वाढला आहे. मनसेने आक्षेप घेतल्यानंतर, पालिकेने अनेक ठिकाणी कारवाई करत हे पट्टे हटवले आहेत.