Ghatkopar Sakinaka Landslide : मुंबईत घरांवर डोंगराचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना, मुंबईच्या महापौरांची पहिली प्रतिक्रिया
Ghatkopar Sakinaka Landslide : दोन ते तीन घरांवर दरड कोसळली असून पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेवर मुंबईच्या महापौर रितू तावडे बोलल्या आहेत.

मुंबईत पावसाळ्यात विविध दुर्घटना घडत असतात. यात जुन्या जर्जर झालेल्या इमारती कोसळणं, भिंत पडणं, झाडं आणि दरड कोसळणं अशा घटना घडतात. बुधवारी मध्यरात्री मुंबईतील घाटकोपरच्या साकीनाका परिरात अशीच एक दुर्देवी घटना घडली. डोंगराचा काही भाग गौसिया चाळ परिसरातील घरांवर कोसळला. दोन ते तीन घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती आहे. मुंबईत कालपासून पावसाने जोर पकडला आहे. पावसाची संततधार सुरु होती. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आत अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
ही दुर्घटना घडल्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी स्वत: तिथे जाऊन पाहणी केली. “काही जण आत अडकल्याची भिती आहे. अगदी युद्ध पातळीवर फायर ब्रिगेड, मुंबई महापालिकेचे कर्मचारी तिथे काम करतायत. मी स्वत: घटनास्थळी जाऊन आले आहे. अविनाश ढाकणे साहेब तिथे आहेत. इतकी अरुंद गल्ली आहे की, एक-एक दगड हाताने बाजूला करावा लागत आहे. अतिशय वाईट दुर्घटना घडली आहे” असं महापौर रितू तावडे म्हणाल्या. स्थानिकांचा रोष पहायला मिळतोय, त्या प्रश्नावर महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “संपूर्ण फायर ब्रिगेड, मुंबई महापालिकेचे कर्मचारी तिथे काम करतायत. एकच व्यक्ती ये-जा करु शकतो इतका बोळ आहे. अग्निशमन दल, फायर ब्रिगेड दगड, माती बाहेर काढण्याचं काम करतायत”
एक-एक दगड, माती, वीट हाताने बाहेर काढावी लागतेय
विकी यादव, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत, आबन शेख आणि सद्दाम शेख अशी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची नावं आहेत. डोंगराचा भाग जिथे कोसळला, तो अत्यंत अरुंद भाग आहे. एक-एक दगड, माती, वीट हाताने बाहेर काढावी लागत आहे. जास्त लोक त्या जागेतून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मदतकार्य करताना अनेक अडचणी येत आहेत.
