अमरावतीत दंगली भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे आले, एका आमदाराने पैसे वाटले; नवाब मलिक यांचा मोठा दावा

| Updated on: Nov 15, 2021 | 4:35 PM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर अमरावतीत दंगल भडकवल्याचा आरोप केला आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनीच दंगलीचा कट रचला होता.

अमरावतीत दंगली भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे आले, एका आमदाराने पैसे वाटले; नवाब मलिक यांचा मोठा दावा
नवाब मलिक
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर अमरावतीत दंगल भडकवल्याचा आरोप केला आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनीच दंगलीचा कट रचला होता. दंगल भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे आले होते. भाजपच्या एका आमदाराने हे पैसे वाटले होते, असा गंभीर आणि खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. भाजपने बंदच्या आडून सुनियोजितपणे दंगली भडकवण्याचं काम केलं. पोलिसांनी हा कट उधळून लावला. राज्यात दंगल भडकवण्याचे भाजपचे षडयंत्र होते. राज्यातील जनतेने संयम राखला. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी दंगली भडकल्या नाही. अमरावती सोडून कुठेच काही घडलं नाही. अमरावतीत कोणत्याही दोन समुदायात दंगल झाली नाही. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी 2 तारखेच्या रात्री दंगलीचं षडयंत्रं रचलं. दारु वाटल्या गेली, पैसे वाटण्यात आले… दंगली भडकावल्या गेल्या. पोलीस चौकशीत माहिती मिळाली आहे. मुंबईतून दंगली भडकवण्यासाठी पैसे गेले. आमदाराच्या माध्यमातून या पैशाचं वाटप करण्यात आलं. त्याचीही चौकशी सुरू आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. सर्व अस्त्र संपल्यानंतर भाजप दंगलीचं राजकारण करत असते. भाजपचे लोक जाणकार आहेत. त्यामुळे ते काहीही करू शकतात, असंही ते म्हणाले.

दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

त्रिपुरातील घटनेनंतर मुस्लिम समाजात नाराजी होती. त्यामुळे मुस्लिम संघटनांनी बंदचं आवाहन केलं होतं. त्याचे पडसाद उमटले होते. पोलिसांनी घटनेला नियंत्रित केलं. ज्या लोकांनी दगडफेक केली. पोलिसांवर दगडफेक केली. अशा सर्व लोकांविरोधात गुन्हे दाखल करून अटक सुरू केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

तो राष्ट्रवादीचा नगरसेवक नाही

दंगलीप्रकरणी राष्ट्रवादीच्या मालेगावातील नगरसेवकावर गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं जात आहे. ते काही खरं नाही. आमदार मुफ्ती यांनी 2014ची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढली होती. त्यांच्यासोबत आलेल्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या तिकीटीवर निवडणूक लढली होती. नंतर काँग्रसेसोबत राष्ट्रवादीची युती झाली. त्यामुळे मालेगाव मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने मुफ्ती हे एमआयएमसोबत गेले. त्यांच्यासोबत इतर नगरसेवकही गेले. कागदपत्रावर ते राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. पण प्रत्यक्षात ते एमआयएममध्ये आहेत. त्यापैकी एका नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तो राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे हे म्हणणं योग्य नाही, असं मलिक म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

‘आपका बंटी’, ‘महाभोज’च्या प्रख्यात लेखिका मन्नू भंडारी यांचं निधन

विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल

‘कितीही आवाज दाबला तरी आता हिंदू मार खाणार नाही’, अटकेनंतर अनिल बोंडेंची संतप्त प्रतिक्रिया