महाराष्ट्रात ना ED ची , ना CBI ची चर्चा, ही NIA काय भानगड आहे ज्यांनी वाझेंना अटक केली? वाचा सविस्तर

| Updated on: Mar 14, 2021 | 10:37 AM

सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) देशांतर्गत दहशतवादी कारवाया आणि राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाची असलेल्या प्रकरणांचा तपास करत असे. | NIA sachin Waze

महाराष्ट्रात ना ED ची , ना CBI ची चर्चा, ही NIA काय भानगड आहे ज्यांनी वाझेंना अटक केली? वाचा सविस्तर
या तपासाची सूत्रे हाती घेतल्यापासून काही तासांतच NIA च्या कारवाईला वेग आला आहे. आतापर्यंत केवळ मनसुख हिरेन प्रकरणात संशयित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यातही सहभाग असल्याची माहिती पुढे आली होती.
Follow us on

मुंबई: राज्यात सध्या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. यापैकी मनुसख हिरेन प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादी प्रतिबंधक पथकाकडे (ATS) आहे. तर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आले आहे. (NIA got major breakthrough in Mukesh Ambani residence explosive car case)

या तपासाची सूत्रे हाती घेतल्यापासून काही तासांतच NIA च्या कारवाईला वेग आला आहे. आतापर्यंत केवळ मनसुख हिरेन प्रकरणात संशयित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यातही सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी NIAच्या हाती सबळ पुरावे लागल्याची माहिती आहे. अधिक तपासासाठी NIA ने शनिवारी रात्री सचिन वाझे यांना अटक केली होती. वाझेंची पोलीस कोठडी मिळवल्यानंतर याप्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या राज्यभरात NIA चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. एरवी केंद्र आणि राज्य सरकारमधील वादामुळे ईडी आणि सीबीआय या संस्था कायम चर्चेत असतात. मात्र, महाराष्ट्रात सध्या NIA ची हवा असल्याचे चित्र आहे.

NIA संस्था कोणत्या गुन्ह्यांचा तपास करते?

सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) देशांतर्गत दहशतवादी कारवाया आणि राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाची असलेल्या प्रकरणांचा तपास करत असे. मात्र, नंतरच्या काळात एनआयए कायद्यात यूएपीए कायदा समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे NIA ला देशातील कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्याचे अधिकार मिळाले होते.

NIA संस्थेचे अधिकार काय?

एनआयए कायद्यातील कलम 6 नुसार ही तपास यंत्रणा कोणताही तपास आपल्या ताब्यात घेऊ शकते. NIA कायद्यात नमूद केलेल्या एखाद्या गंभीर घटनेची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात झाली असेल तर त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवावा लागतो आणि राज्य सरकार त्याचा अभ्यास करून पुढील 15 दिवसांत तो अहवाल आपल्या टिप्पण्यांसह केंद्र सरकारकडे पाठवत असते. त्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे द्यायचे की नाही याचा निर्णय केंद्र सरकार घेते.

जर केंद्राला ते प्रकरण एनआयएकडे द्यावे असे वाटत असेल तर तसे प्रकरण वर्ग करता येते. जेव्हा एखाद्या राज्याकडून ते प्रकरण केंद्र काढून घेते तेव्हा त्या प्रकरणासंदर्भातील सर्व कागदपत्रे, पुरावे एनआयएकडे सुपूर्द करावे लागतात. तसेच देशाबाहेर घडलेल्या गुन्ह्यांचा तपासही केंद्र सरकार एनआयएकडे सोपवू शकते.

NIA ने आतापर्यंत कोणत्या प्रकरणांचा तपास केला?

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आतापर्यंत देशातील अनेक हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली आहेत. यामध्ये मालेगाव बॉम्बस्फोट, पुलवामा दहशतवादी हल्ला, अजमेर दर्गा बॉम्बस्फोट, समझौता एक्स्प्रेस आणि हैदराबाद मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणांचा समावेश आहे.

एनआयएचे प्रमुख विक्रम कलहाटे मुंबईत दाखल

सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर अधिकारी विक्रम खलाटे रविवारी सकाळी मुंबईतील NIA च्या कार्यालयात पोहोचले. विक्रम खलाटे हे 2008-09 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. बारामती तालुक्यातील लाटे हे त्यांचं मूळ गाव आहे. गेल्या 13 वर्षांपासून ते पोलीस सेवेत कार्यरत असून त्यांना आतापर्यंत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दोनवेळा गौरवण्यात आले आहे. सध्या ते एनआयएचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

संबंधित बातम्या:

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप

पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

(NIA got major breakthrough in Mukesh Ambani residence explosive car case)