
लाखो मराठ्यांनी मुंबईची तुंबई केली आहे. वाशी ते आझाद मैदानापर्यंत मराठ्यांची त्सुनामी आली आहे. त्याचा थेट परिणाम मुंबईच्या जनजीवनावर होईल. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणावर ठाम आहेत. तर दुसरीकडे सरकारच्या भूमिकेवर ओबीसी नेत्यांनी त्रागा केला आहे. सरकार जरांगेंसाठी रेड कार्पेट अंथरत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला. त्यात प्रा. लक्ष्मण हाके यांनी तर जरांगेंर जहरी टीका केली आहे.
या दोन नेत्यांची जरांगेंना रसद
या महाराष्ट्रात धुंद शाही जोमात आणि लोकशाही कोमात गेली आहे. झुंडशाहीचा जोरावर महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातल्या जात असल्याचा आरोप प्रा. हाके यांनी केला. जरांगे नावाच्या काडेपेटीचा ज्वालामुखी करण्यात आला आहे. हे काम सर्वपक्षीय आमदार खासदारांनी केल्याची टीका त्यांनी केली. जरांगे नावाच्या काडेपेटीला ओबीसीमधून आरक्षण का पाहिजे? असा सवाल त्यांनी केला.
जरांगेंना सपोर्ट करणारे कारखानदार आणि वतनदार आमदार, खासदार आहेत. जरांगे नावाच्या काडीला ज्वालामुखीत रूपांतर करण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप प्रा. लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत केला.
हा सरकार उलथवण्याचा प्रयत्न
जरागे हुकूमशाहा आहेत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत. हा आरक्षणाचा लढा नाहीये. जरांगेनी मुंबईकडे निघताना स्क्रिप्ट फोडली. ते म्हणले मी सरकार उलथून लावणार. सरकार उलथवण्यासाठी जरांगेसह अजित पवारांचे आमदार खासदार सामील असल्याचा गंभीर आरोप हाके यांनी केला. नांदेडचे खासदार चव्हाण यांनी जरांगेंना लेखी पाठिंबा दिला आहे.
लक्ष्मण हाके वर गुन्हा, जरांगेला रेड कार्पेट
अजितदादांचे आमदार जरंगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवत असल्याचा आरोप हाकेंनी केला. आम्ही गावगड्यात 50 % आहोत. सगळे एकत्र झाले तर तुमचं काय होईल. तुम्ही obc आरक्षण संपवायला चालला आहात. अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न आहे. आम्ही उद्या पुण्यात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार. आम्ही ओबीसी जोडो अभियान सुरु करू. ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी,ओबीसी मंत्र्यांना ओबीसी माफ करणार नाहीत. लक्ष्मण हाकेंवर गुन्हा आणि जरांगेला रेड कार्पेट टाकण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा आम्ही स्वागत करत आहोत
मी चुकीचा आहे, असा कोणताही obc नेता म्हणलेला नाही. मी आमदार खासदाराचा पोरगा नाही, मी चुकीचा असेल तर मला आतामध्ये टाका. आता जातीजातीत भांडायची वेळ नाही. मी आत्महत्या करू का? म्हणजे प्रश्न सुटतील..obc एकत्र येत आहोत. आम्ही देखील आंदोलन करणार आहोत. बीड ज्या पद्धतीने पेटलं, ती परिस्थिती मुंबईमध्ये होऊ शकते. गृह विभागाकडून सामाजिक दुजाभाव सुरू आहे.
मंत्रिमंडळात भुजबळ साहेब नक्की प्रश्न विचारतील. छगन भुजबळ बोलतील हा आमचा विश्वास आहे. उद्या आमची मीटिंग होत आहे उद्या पुढील दिशा ठरवू. जीवात जीव असेपर्यंत आम्ही लढणार आहोत. प्रकाश सोळंके,विजय पंडित यांनी पहिल्यांदा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा बजरंग सोनवणे देखील राजीनामा द्यावा मग जरांगे आंदोलनात सहभागी व्हावे. वेळ पडली तर आम्ही मुंबईला देखील जाऊ, अशी भूमिका हाके यांनी मांडली.
तर ओबीसी रस्त्यावर उतरेल
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाच्या मुद्द्यावर ओबीसी नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. घटनाबाह्य मागण्या अशाच सुरू राहिल्या तर आम्हीही रस्त्यावर उतरून संघर्ष करू असा इशारा ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य करणे हे चुकीचे असून जरांगे यांनी केलेल्या वैयक्तीक टीकेचा ओबीसी नेत्यांनी निषेध केलाय. फडणवीस यांनीच 10 टक्के आरक्षण दिले आहे मात्र आता मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात सरसकट समावेश हे चुकीचे आहे असे सांगत हे दबावाचे राजकारण आहे,कोण करतंय सर्वांना माहीत आहे असा टोला डॉ. जीवतोडे यांनी लगावला. याआधीच्या मराठा मुख्यमंत्र्यांना हे शक्य झाले नाही कोणत्याही कोर्टात हे टिकणार नाही असेही भाजपच्या ओबीसी राज्य सेलचे उपाध्यक्ष असलेल्या जिवतोडे यांनी म्हटले आहे.