कोणी काजू, बादाम खाण्यासाठी गेले नव्हते, पंकजा मुंडे यांनी विरोधकांना फटकारलं

नांदेड दुष्काळ बैठकीतील काजू-बदाम वादावर पंकजा मुंडे यांनी विरोधकांना फटकारले. "बैठक शेतकऱ्यांसाठी होती, काजू-बदाम खाण्यासाठी नव्हे," असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने दुष्काळ निवारणावर केलेल्या उपाययोजनांवर त्यांनी भर दिला.

कोणी काजू, बादाम खाण्यासाठी गेले नव्हते, पंकजा मुंडे यांनी विरोधकांना फटकारलं
pankaja munde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 3:29 PM

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे नांदेडला दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. यावेळी बैठकीत लोकप्रतिनिधींना काजू आणि बादाम देण्यात आल्याने वादंग निर्माण झाले आहे. राज्यात दुष्काळ पडलाय आणि लोकप्रतिनिधी काजू, बादामवर ताव मारून शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या या टीकेचा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्या बैठकीला लोकप्रतिनिधी काय बादाम, काजू खाण्यासाठी गेले नव्हते. ती बैठक काय काजू, बादामासाठी घेतली होती का? असा संतप्त सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे.

मंत्री पंकजा मुंडे या टीव्ही9 मराठीशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी विरोधकांना हा सवाल केला आहे. कोणत्याही बैठकीची एक व्यवस्था असते. बैठकीत चहापाणी, काजू, बादाम दिले जातात. काही गोष्टी सर्व्ह केल्या जातात. तिथे कोणी काही काजू, बादाम खाण्यासाठी जात नाही. आम्ही काही काजू, बादाम खाण्यासाठी जात नाही. मूळात काजू, बादाम हा काही महत्त्वाचा विषय नाही. बैठक शेतकऱ्यांसाठी होती. तो विषय महत्त्वाचा आहे. काजू बादामासाठी बैठक घेतली का? चहापाणी दिल्याने त्याचा इश्यू करू नये, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

आम्ही शेतकऱ्यांच्या मागे

राज्य सरकार दुष्काळ कधी जाहीर करणार? असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक येतं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून हे काम करतं. आम्ही निवडणुका नसताना वीजमाफी केली. कर्जमुक्ती दिलीच ना? शेतकऱ्यांना आमच्यावर विश्वास आहे. आम्ही जागरुक राहून उपाययोजना करत आहोत. 32 हजार कोटींची कर्जमाफी, वीजबील माफी दिली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कसं घेता येईल, बी बियाणे कसं पोहोचू शकू हा आमचा प्रयत्न आहे. पण निसर्गाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या मागे आहोत. अन्न धान्य, चारा आणि पाण्याची व्यवस्था करत आहोत, असं पंकजा यांनी स्पष्ट केलं.

मी जालना, बीडला जाणार

एनडीआरएफचे काही नियम आहेत. त्यात परतीच्या पावसाच्या कधीपर्यंत पंचनामे करायचे हे ठरलेलं आहे. पण त्यावर आम्ही थांबलेलो नाही. कृषी मंत्र्यांनी आज आढावा घेतला आहे. मी जालना आणि बीडमध्ये जाऊन पाहणी करणार आहे. पंचनामे आज आणि आठ दिवसाने केल्याने फरक पडणार नाही. आम्ही आधीच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम सुरू केलं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

वेगवेगळी आंदोलने सुरू

यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. सध्या आरक्षणावर वेगवेगळ्या समाजाची आंदोलने सुरू आहेत. धनगर, बंजारा, आदिवासींचं आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाचं वेगवेगळ्या धर्तीवर आंदोलन सुरू आहे. समाज विभाजित होतो. ही अस्वस्थता खालपर्यंत जाते. आम्ही आरक्षणाला पाठिंबा देतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us