अजितदादा स्पष्टवक्ते आहेत; ‘मविआ’मुळे राज्य अधोगतीकडे;अजित पवारांनी सोबत यावं;राधाकृष्ण विखे पाटलांची साद
राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीविषयी सांगताना त्यांनी सांगितले की, यावेळीही राज्यसभेपेक्षा वेगळा निकाल लागणार नाही. विधान परिषदेलाही भाजपचे पाचही उमेदवार विजयी होणार असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईः अजित पवार (Ajit Pawar) हे स्पष्टवक्ते असून त्यांनी सोबत यावे अशी साद भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishn Vikhe-patil) यांनी आपल्या प्रकट मुलाखतीतून घातली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार आणि मी अनेक वर्षे सोबत काम केलं आहे. त्यांच्या कामाची धमक मला माहीत आहे. महाविकास आघाडी सरकारमुळे (Mahavikas Aghadi Giverment) राज्य अधोगतीकडे चालल असून प्रगतशील महाराष्ट्रासाठी भाजप सरकार गरजेचे असून त्यासाठी अजितदादांनी सोबत यावं ही भावना त्यामागे होती असं विखे पाटील यांनी म्हटले आहे. आज एका लघु उद्योग केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
राज्यसभेपेक्षा वेगळा निकाल नाही
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीविषयी सांगताना त्यांनी सांगितले की, यावेळीही राज्यसभेपेक्षा वेगळा निकाल लागणार नाही. विधान परिषदेलाही भाजपचे पाचही उमेदवार विजयी होणार असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला किंमत नाही
आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कोणतीही किंमत नाही. केवळ आर्थिक लाभासाठी मंत्री सत्तेत आहेत. आर्थिक लाभासाठी ते सरकारमध्ये टिकून असून पक्षातील अनेक आमदार सरकारवर नाराज असल्याचा दावाही विखे पाटील यांनी केला आहे. मंत्री केवळ आपलं आर्थिक गणित जुळवण्यात मश्गुल आहेत त्यामुळे त्यांना राजकीय गणित कळत नसल्याची टीका विखे पाटल यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता केली आहे.
ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणं हास्यास्पद
ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणं हास्यास्पद असून जर तुमची बाजू सत्याची आहे तर घाबरण्याचे कारण काय..? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. ईडीच्या कार्यालयासमोर सुरू असलेला तमाशा ताबडतोब थांबवला पाहिजे अन्यथा गैरकारभाराचा संशयाचं घर जनतेच्या मनात पक्क होणार. निरपेक्षपणे चौकशी यंत्रणेला काम करू दिलं पाहिजे असंही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला
आपल्या प्रकट मुलाखतीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार सुजय विखे पाटील यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला होता. त्याबाबत बोलताना तरूण वयात मीही अशाच पद्धतीने वक्तव्य करायचो. आमच्या मनात काहीही भावना नसतात. मात्र राजकीय ध्रुवीकरणात वक्तव्याचा विपर्यास केला जातो असे सांगत कोणाला संधी मिळू नये म्हणून श्रद्धा आणि सबूरीने पुढं गेलं पाहिजे असा सल्ला सुजयला दिल्याचं त्यांनी सांगितले.