Raj Thackeray: शेवटचं सांगतोय, कामाला लागा, नाही तर थेट… राज ठाकरेंचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना 29 जूनपर्यंतचा अल्टिमेटम
Raj Thackeray Warning to Party Workers: पक्षातील मरगळ झटकण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांना चांगली तंबी दिली आहे. स्थानिक प्रतिनिधींनी घरात बसू नये आता त्यांनी कामाला लागावं असं त्यांनी बजावले. काय दिला राज ठाकरे यांनी कानमंत्र?

Raj Thackeray Warning: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. आज मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी पक्षातील मरगळ झटकण्यासाठी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुनावले. स्थानिक प्रतिनिधींनी घरात बसू नये, ढिम्म राहू नये असा इशारा त्यांनी दिला. राज ठाकरे यांनी या बैठकीत कार्यकर्त्यांना कामगिरी सुधारण्यासाठी २९ जून पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. ठाकरे शैलीत समाचार घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांना कोणत्या विषयावर काय करायचे याचा कानमंत्रही राज ठाकरे यांनी दिला.
मनसे पदाधिकाऱ्यांना अल्टिमेटम
राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना कान टोचत २९ जून पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. शेवटचं सांगतोय – कामाला लागा, माझ्याकडे रिपोर्ट आल्यानंतर पदावरुन हटवलं तर माझ्याकडे येऊ नका. एकच गोष्ट वारंवार कितीवेळा सांगायची? वेळ कमी आहे. घरातल्यांनाही कामाला लावा, अशा प्रकारे राज ठाकरे यांनी मनसेच्या विभागाध्यक्षांचेही कान टोचले. त्यांनी पदाधिकाऱ्यांचे चांगले कान टोचले आहे. पक्षातील मरगळ झटकण्यासाठी ठाकरे शैलीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना फटकारले.
कामाचा काय दिला अजेंडा?
एसआयआर संदर्भातील कामाला वेग द्या. मुंबईत मनसेच्या बिएलएची नेमणूक करा मुंबई शहरात ३००० तर उपनगरात ८००० बिएलए हवेत. मनसेच्या बिएलएची नोंदणी संख्या फक्त ९९७ इतकीच आहे, याकडे त्यांनी पदाधिकारी आणी कार्यकर्ते यांचे लक्ष वेधले. विभागअध्यक्ष तुम्ही ढिम्म बसून राहु नका, घरात बसुन राहू नका. पायाला भिंगरी लावून फिरा. राज ठाकरे यांनी अशा कडक शब्दात सूचना दिल्या आहेत. त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना २९ जून पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. जर यानंतरही तक्रार आली तर अशा पदाधिकाऱ्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल असे त्यांनी बजावले आहे.
जैन समाजाच्या प्रतिनिधींना ठाकरे शैलीत समज
मुंबईत अनेक ठिकाणी दुकानांच्या पाट्या आणि मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे जैन आणि मराठी समाजात विनाकारण वाद निर्माण होत आहेत. हे वाद तातडीने थांबवले गेले पाहिजे. मराठी अस्मितेचा आदर राखलाच गेला पाहिजे, अशा कडक शब्दात राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या प्रतिनिधींना सुनावले. आज मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची वादग्रस्त घटना घडली होती. त्यामुळे शिवप्रेमी संतापले होते. आज या घटनेवर जैन समाजाच्या प्रतिनिधींनी दिलगिरी व्यक्त केली. कोणत्याही समाजाच्या अथवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला ठेच पोहचवण्याचा आमचा हेतू नव्हता असे शिष्टमंडळाने सांगितले.