मोर्चाच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांची पोस्ट; काय दिले आदेश?
नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी मुंबईत 'तिरंगा मार्च' आयोजित केला आहे. मोर्चाच्या आदल्या दिवशी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. हा मोर्चा अराजकीय असून, केवळ विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे.

नीट परीक्षेत झालेला घोटाळा आणि जंतरमंतरवर सीजेपीने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधुंनी उद्या रविवारी मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं यासाठी दोन्ही मनसे आणि उबाठाकडून जोरदार तयारी केली जात आहे. उद्याचा मोर्चाच अतिविराट निघणार असल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून राज ठाकरे यांनी मनसे सैनिक, शिवसैनिक आणि मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. खासकरून हा विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे, याचं भान बाळगण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
हा ‘तिरंगा मार्च’ हा दिल्लीतलं सरकार आणि त्यांच्या आदेशानुसार दिल्लीतील पोलीस जी मुजोरी दाखवत आहेत याचा निषेध करण्यासाठी आहे. तसंच हा मोर्चा जे विद्यार्थी सरकारला अजिबात न जुमानता ठामपणे उभे आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या घरच्यांसाठी आणि जे दिल्लीला जाऊ शकत नाहीत किंवा मुंबईला येऊन निषेध व्यक्त करू शकत नाहीत त्यांना तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे हे दाखवण्यासाठी आहे. हा ‘तिरंगा मार्च’ आहे, असं राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.
आमच्या नावाने घोषणा नको
हा मोर्चा पूर्णपणे अराजकीय आहे, इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनाच्या घोषणा नसतील. सरकारचा निषेध असेल, आणि देशभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणींना आपण जो पाठिंबा दर्शवत आहोत त्यासाठीच्या घोषणा असतील. मोर्च्याचे निमंत्रक मी आणि उद्धव असलो तरी आमच्याही नावाने कुणी घोषणा द्यायच्या नाहीत. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे याचं भान आपण बाळगायचं आहे आणि ते तुम्ही बाळगालच याबद्दल तिळमात्र शंका नाही, असं त्यांनी म्हटलंय.
पालकांनाही घेऊन या
बाकी महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या हे सांगायची गरजच नाही. ते तुम्ही येणारच. पण जास्तीत जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना पण घेऊन या, त्यांची मोर्च्यात काळजी घ्या आणि ते पुन्हा सुखरूप घरी जातील हे पहा. बाकी सरकारचं माहित नाही पण महाराष्ट्रातील पोलीस हे आपल्यासोबत आहेत कारण त्यांच्यासमोर पण मुलाबाळांच्या आयुष्याचा पण प्रश्न आ वासून उभा आहे, असं ते म्हणाले.
आम्ही वाट बघतोय
बाकी कुठे भेटायचं? किती वाजता भेटायचं? याचा तपशील तुमच्याकडे आहेच. तेव्हा 26 जुलैला ‘तिरंगा मार्च’ ला भेटूया. सर्वांनी सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्या जवळ जमायचं आहे. आम्ही आपली, विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची वाट बघतोय. जनतेच्या मनातील संताप काय आहे हे या शांततापूर्ण मोर्चाने दिल्लीश्वरांना दाखवून देऊया, असं आवाहनही त्यांनी केलंय.