जयंत पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर; काय आहे राष्ट्रवादीचा प्लॅन?

| Updated on: Jan 23, 2021 | 6:02 PM

ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम संपताच राष्ट्रावादी काँग्रेसने येत्या 28 जानेवारीपासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. (rashtrawadi parivar samvad yatra and ncp's political strategy)

जयंत पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर; काय आहे राष्ट्रवादीचा प्लॅन?
Follow us on

मुंबई: ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम संपताच राष्ट्रावादी काँग्रेसने येत्या 28 जानेवारीपासून ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. स्वत: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यानंतरही राष्ट्रवादीने ही यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही यात्रा काढण्यामागे राष्ट्रवादीचा नेमका काय प्लॅन आहे? यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप. (rashtrawadi parivar samvad yatra and ncp’s political strategy)

१४ जिल्हे, ८२ मतदारसंघ

राष्ट्रवादीच्या या परिवार संवाद यात्रेला २८ जानेवारीपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. या निमित्ताने १७ दिवस ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. १७ दिवसांच्या या दौऱ्यात विदर्भ व खान्देशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या १३५ बैठका व १० जाहीर सभा होणार आहेत.

बड्या नेत्यांची हजेरी

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात माझ्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित राहतील.

यात्रा कशासाठी?

या परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवण्यात येणार आहे. तसेच कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठीही ही यात्रा काढण्यात येणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीला बेस वाढवायचाय

राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत असली तरी प्रत्येक पक्षाला आपली स्पेस कशी वाढेल याची काळजी वाटते. ती काळजी म्हणजेच राष्ट्रवादीची हा यात्रा आहे, असं म्हणता येईल, असं दैनिक आपलं महानगरचे कार्यकारी संपादक संजय परब यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस हा ठरावीक जिल्ह्यातील पक्ष आहे. पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील काही ठिकाणी हा पक्ष आहे. मुंबई आणि कोकणात राष्ट्रवादीचा बेस नाही. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा जनाधार मोठा आहे. मराठवाड्यातही काही प्रमाणात राष्ट्रवादी आहे. पण विदर्भात या पक्षाचं अस्तित्व अत्यंत कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये बेस वाढवण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू असावा, असं संजय परब यांनी सांगितलं.

पक्षाचं स्वरुप बदलण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस हा नेत्यांचा पक्ष किंवा संस्थानिकांचा पक्ष असल्याचं एक चित्रं आहे. ही चौकट मोडून राष्ट्रवादीला कार्यकर्ता आणि जनतेचा पक्ष असल्याची इमेज निर्माण करायची आहे. पक्षाचं हे स्वरुप बदलण्यासाठी सुद्धा ही यात्रा आयोजित केली असावी, हे नाकारता येत नाही, असं परब म्हणाले. पक्षाला टिकवायचं असेल तर आपले पारंपारिक किल्ले सोडून पुढे जावंच लागेल, हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं असेल त्यामुळेही पक्षविस्तार करण्यासाठी राष्ट्रवादीने राज्य पिंजून काढण्याचा निर्णय घेतला असावा, असं त्यांनी सांगितलं. या शिवाय जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना सतत कार्यक्रम देणं हे त्यांचं काम आहे. त्यामुळेही कार्यकर्त्यांच्या हाती काही तरी कार्यक्रम असावा म्हणूनही त्यांनी ही यात्रा सुरू केली असावी, असंही त्यांनी सांगितलं. (rashtrawadi parivar samvad yatra and ncp’s political strategy)

 

संबंधित बातम्या:

प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार, राष्ट्रवादीची संवाद यात्रा, स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटलांचं मोठं भाष्य

भाजपकडून पक्ष प्रवेशासाठी 100 कोटींची ऑफर होती- शशिकांत शिंदे

बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी हिंदुत्व शिकवू नये – भाजप

(rashtrawadi parivar samvad yatra and ncp’s political strategy)