Rohit Patil: रोहित पाटील म्हणतात, संघर्ष आम्हाला नवा नाही; भाजपच्या नेत्यानेही केलं अभिनंदन

| Updated on: Jan 21, 2022 | 5:20 PM

आबांनाही ( आरआर पाटील) राजकारणात 20 ते 30 वर्ष संघर्ष करावा लागला. त्यानंतर ते शिखरावर पोहोचले. संघर्ष आम्हाला नवा नाही. नगरपंचायतीच्या निवडणुकीतही संघर्ष करावा लागला.

Rohit Patil: रोहित पाटील म्हणतात, संघर्ष आम्हाला नवा नाही; भाजपच्या नेत्यानेही केलं अभिनंदन
Rohit Patil
Follow us on

मुंबई: आबांनाही ( आरआर पाटील) राजकारणात 20 ते 30 वर्ष संघर्ष करावा लागला. त्यानंतर ते शिखरावर पोहोचले. संघर्ष आम्हाला नवा नाही. नगरपंचायतीच्या निवडणुकीतही संघर्ष करावा लागला, असं राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील यांनी सांगितलं.

नगर पंचायत निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यामुळे रोहित पाटील यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. या निमित्ताने टीव्ही 9 मराठीशी विशेष संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे. या विजयाने घरचे प्रचंड आनंदी आहेत. जे काम आम्ही करतोय त्याचं त्यांना समाधान आहे. या पुढच्या काळात अधिक चांगलं काम करण्याच्या शुभेच्छाही कुटुंबाने दिल्या आहेत. आबा असते तर वेगळं मार्गदर्शन मिळालं असतं. वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती. आबांनी राजकारणात 20-30 वर्ष संघर्ष केला. त्यानंतर ते शिखरावर पोहोचले होते. संघर्ष आम्हाला नवा नाही. आबा गेल्यानंतर जी परिस्थिती ओढवली होती. त्यातून आम्ही सर्व मार्ग काढत होतो. हा मार्ग काढत असताना त्यांची उणीव नेहमीच भासली. पण त्यांची शिकवण आमच्याबरोबर नेहमी होती. त्यांचे विचार आमच्यासोबत नेहमी होते. मी रक्ताचा वारसदार असलो तरी आबांनी विचाराचे वारसदार तयार केले आहेत. त्या विचारांच्या वारसदारांच्या जोरावरच आमची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आज आबा नाहीत याची उणीव आम्हाला भासत आहे, असं रोहित म्हणाले.

आबांना ते शल्य होतं

लहानपणापासून आबांचा फार सहवास लाभला नाही. त्यामुळे या विजयानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असती हे माहीत नाही. पण त्यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. 2014च्या विधानसभेला साडेपाच ते सहा हजाराचे मताधिक्य मिळाले होते. एवढी कामे करूनही कमी मताधिक्य मिळाल्याचं शल्य त्यांना बोचलं होतं. पण मागच्या निवडणुकीत त्याच तालुक्यात आम्ही 13 हजाराचे मताधिक्य मिळवलं. विधानसभेतील आश्वासने दोन वर्षात पूर्ण केली. दिलेला शब्द पाळतो हे लोकांना दिसून आलं आहे. जनतेचा आमच्यावरील विश्वास वाढला आहे. त्यामुळे हा विजय मिळाला आहे, असंही ते म्हणाले.

नव्या जबाबदाऱ्या देणारा विजय

हा विजय मोठ्या आणि नव्या जबाबदाऱ्या घेऊन आला आहे. शहरच नाही तर सर्व मतदारसंघात स्पेसिफिक व्हिजन ठेवून आम्ही काम करणार आहोत. जनता जी जबाबदारी देईल ती आम्ही पार पाडू, असंही ते म्हणाले.

पवारांपासून वाघांपर्यंत शुभेच्छा

या निवडणुकीत सर्व नेत्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. दहाही उमेदवार पहिल्यांदा नगरसेवक झाले आहेत. नवीन उमेदवारांना, तरुणांना जनतेने संधी दिली आहे. आम्ही सर्वांना घेऊन लढत आहोत. जिंकल्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा निरोप आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया, मंत्री नवाब मलिक, मंत्री जितेंद्र आव्हाडांनी फोन करून अभिनंदन केलं. चित्रा वाघ यांनीही अभिनंदन केलं. सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला आशीर्वादासारख्या आहेत. आम्हाला त्यातून ऊर्जा मिळेल. आशीर्वादाचा डोंगर उभा केला याबद्दल आभार मानतो, असंही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

Anil Deshmukh : सचिन वाझेनी घेतली अनिल देशमुखांची शाळा, उलट तपासणीत काय घडलं; वाचा टू द पॉईंट

Nagpur Crime | रामटेकमधील दुहेरी खुनाचा उलगडा; कुऱ्हाडीने वार करून फेकले होते, नेमकं काय घडलं?

शाळांपाठोपाठ वसतिगृहेही सुरु होणार, धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला आदेश