Raj Thackeray : गेम फिरला,स्वत: राज ठाकरेंनीच रिक्षा, टॅक्सी चालकांचा विषय हातात घेतला, सरळ आदेश जो कोणी..
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा विषय हातात घेतला आहे. त्यामुळे 4 मे रोजी रिक्षा चालकांनी संपाचा जो इशारा दिलाय, त्यावेळी काय घडणार? हा प्रश्न आहे. राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावरुन राजकारण तापत चाललं आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी येत्या 1 मे पासून महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन जोरात राजकारण सुरु आहे. प्रताप सरनाईक आणि संजय निरुपम हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. संजय निरुपम यांचा प्रताप सरनाईक यांच्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला विरोध आहे.त्यांनी या संदर्भात प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिलं आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. मराठी भाषा सक्तीची केली, तर येत्या 4 मे पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा रिक्षा चालकांनी दिला आहे.
त्यांच्या या निर्णयासा मनसेने विरोध केला आहे. “ज्या पद्धतीने मुंबईला बंद पाडण्याची धमकी देत देत आहेत, धमकी देणाऱ्या भैय्याला धडा शिकवण्याची हीच ती योग्य वेळ आहे. मुंबई आमच्याशिवाय चालूच शकत नाही अशांना धडा शिकवा. स्थानिक भाषा येत नसताना देखील यांना लायसन्स दिली कोणी? अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी संदीप देशपांडे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. आता स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयात लक्ष घातलं आहे. राज्याचा परिवहन विभाग नेमका ऑटो रिक्षा चालकांच्या मराठी सक्ती संदर्भात काय निर्णय घेतो याकडे आपलं लक्ष असेल असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
मराठी रिक्षा चालकांच्या पाठीशी मनसे पक्ष उभा राहणार
उत्तर भारतीय रिक्षा चालकांकडून होणाऱ्या संपाला मनसे विरोध करणार. मराठी रिक्षा चालकांच्या पाठीशी मनसे पक्ष उभा राहणार. संप करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार. अशी राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर पक्षाची भूमिका मांडली आहे. ‘परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्याला जशास तसं उत्तर द्या’ अशी राज ठाकरे यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमोर पक्षाची भूमिका मांडली आहे. “तुमची ताकद आम्हाला 4 तारखेला दाखवा. या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय.
मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?
मुंबई, महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “पहिली गोष्ट म्हणजे मुंबई, महाराष्ट्रात मराठीचा आग्रह होणं, मराठीला प्राथमिकता द्या सांगणं चुकीचं नाही. वाद होऊ नये ही आमची भूमिका आहे. ज्यांना टॅक्सी, रिक्षा चालकांना मराठी येत नाही, त्यांना मराठी शिकवू” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.