MLC Election 2022: समोरच्यांनाही धोका नाही का?, धोका काय एकतर्फी असतो का?; संजय राऊतांचं सूचक विधान

MLC Election 2022: नाना पटोले यांनी जे सांगितलं आहे. त्यात तथ्य आहे. आमदार आपआपल्या पक्षाच्या कँपात असताना त्यांना दाब दबाव येत होते. निरोप येत होते. आमच्यासमोरही हे सुरू होतं. पण काही होणार नाही.

MLC Election 2022: समोरच्यांनाही धोका नाही का?, धोका काय एकतर्फी असतो का?; संजय राऊतांचं सूचक विधान
समोरच्यांनाही धोका नाही का?, धोका काय एकतर्फी असतो का?; संजय राऊतांचं सूचक विधान
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 20, 2022 | 10:35 AM

मुंबई: महाविकास आघाडीची (maha vikas aghadi) एकजूट आहे. आघाडीतील तीन पक्ष आणि त्यांच्या समर्थकांची ही एकजूट कशी आहे हे साधारण रात्री 8 वाजता कळेल. महाविकास आघाडी हातात हात घालून जात आहे. आम्हाला धोका आहे वगैरे शब्द या क्षणी वापरणं योग्य नाही. आम्हाला धोका आहे, समोरच्यांना धोका नाही का? धोका काय एकतर्फी असतो का? कसला धोका आहे?, असा सूचक सवाल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Election 2022) मतदान सुरू झालं आहे. त्यापूर्वीच राऊत यांनी हे सूचक विधान करून भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. राऊत यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. यावेळी राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपकडून आमदारांवर दबाव आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

नाना पटोले यांनी जे सांगितलं आहे. त्यात तथ्य आहे. आमदार आपआपल्या पक्षाच्या कँपात असताना त्यांना दाब दबाव येत होते. निरोप येत होते. आमच्यासमोरही हे सुरू होतं. पण काही होणार नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीला मालक निर्माण झाले असले तरी आम्ही त्यांच्यावर मात करू. तिन्ही पक्षाचे अधिकृत उमेदवार निवडून येईतील, असं राऊत यांनी सांगितलं.

विजय आमचाच होणार

आघाडीतील नेत्यांचा संवाद सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या सर्वांमध्ये उत्तम संवाद सुरू आहे. त्यामुळे आमचे उमेदवार विजयी होणारच. संध्याकाळी तुम्हाला ते निकालातून दिसेलच, असंही त्यांनी सांगितलं.

अराजकाची ठिणगी पडली आहे

अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ भारत बंद पुकारण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अराजकाची ठिणगी पडली आहे. हे अराजक आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, एक दिवस देशात अराजकाची ठिणगी पडेल. तेव्हा राज्य करणं कठिण जाईल. राज्यकर्त्यांनी शहाणपणाने निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. तरुण रस्त्यावर उतरले नसते, असं ते म्हणाले.