वारिसेंसह कोकणातील इतर हत्याकांडाची केंद्राच्या स्पेशल टीमकडून चौकशी करा; संजय राऊत यांची मागणी

| Updated on: Feb 11, 2023 | 11:32 AM

श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकूश राणे, रमेश गोवेकर आणि आता शशिकांत वारिसे यांची कोकणात हत्या झाली. अजूनही अनेक अज्ञात लोक असतील त्यांची हत्या झाली असेल.

वारिसेंसह कोकणातील इतर हत्याकांडाची केंद्राच्या स्पेशल टीमकडून चौकशी करा; संजय राऊत यांची मागणी
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यासह कोकणात अलिकडच्या काळात ज्या चार पाच हत्या झाल्या. त्याची केंद्र सरकारने स्पेशल टीम मार्फत चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तसेच वारिसे यांच्या हत्याकांडामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे, असा दावा करतानाच वारिसे यांच्या कुटुंबीयांना 50 लाखाची आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

आमचे खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी हे वारिसे यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. त्यांचं सांत्वन करून माहिती घेणार आहे. मी स्वत: वारिसे यांच्या कुटुंबीयांना भेटायला जाणार आहे. त्यानंतर पुढील रणनीती ठरवू. खुनामागचे खरे सूत्रधारा तुरुंगात पाठवले जात नाही तोपर्यंत आम्ही या प्रकरणावर आवाज उठवू.

हे सुद्धा वाचा

सर्व माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवू. केंद्रीय गृहमंत्र्याने स्पेशल टीम पाठवावी. वारिसे यांच्यासह कोकणातील या आधीच्या चारपाच हत्येचा एकत्रित तपास करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

तर गुंडांना बळ मिळेल

सरकार बदलल्यापासून कोकणातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाणारमधील लोकांचं भविष्यात नुकसान होणार आहे. शेती नष्ट होईल. मासेमारी धोक्यात येईल. त्यामुळे स्थानिक लोकांच्या मनात भीती आहे. स्थानिकांचा रिफायनरीला विरोध आहे म्हणून शिवसेना त्यांच्यासोबत आहे.

केंद्रीय मंत्री, गृहमंत्री रिफायनरीच्या मुद्द्यावरून वारंवार धमकावत आहेत. धमकावलं जात असेल तर गुंडांना ताकद मिळेल. गेल्या 25 वर्षात कोकणात ज्या राजकीय हत्या झाल्या, त्यापैकीच ही एक हत्या आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे, असं राऊत म्हणाले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

कोकणात पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. याच कोकणाच्या भूमीत पत्रकाराची हत्या होत असेल आणि सरकार हातावर हात ठेवून बसले असेल तर याचा अर्थ काय? आंतराराष्ट्रीय पातळीवर या हत्येची दखल घेत आहे. देशात या हत्येची चर्चा सुरू आहे. कोकणात आतापर्यंत ज्या हत्या झाल्या, त्यातीलच ही एक हत्या आहे, असा दावा त्यांनी केला.

म्हणूनच वारिसेंची हत्या

श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकूश राणे, रमेश गोवेकर आणि आता शशिकांत वारिसे यांची कोकणात हत्या झाली. अजूनही अनेक अज्ञात लोक असतील त्यांची हत्या झाली असेल. वारिसे प्रकरणात पोलिसांवर दबाव आहे.

रिफायनरीच्या विरोधकांना मग ते पत्रकार असेल, कार्यकर्ते असतील, स्वयंसेवी संस्था असतील त्यांच्यावर दडपण आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलिसांना देण्यात आले आहेत. म्हणूनच वारिसेची हत्या झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

बेफिकीरीमुळेच हत्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र लिहिलं आहे. त्यांच्याकडे मी वारिसे यांच्या कुटुंबीयांना 50 लाखाची मदत करण्याची मागणी केली आहे. सरकारच्या बेफिकीरीमुळे ही हत्या झाली. हा सरकारने केलेला खून आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब मदत करावी, असंही त्यांनी सांगितलं.

ही झुंडशाही

ईडी, सीबीआय, पोलीस आणि आयकरच्या कारवाईत विरोधकांना अडकवलं जात होतं. आता पुढचं पाऊल टाकलं गेलं आहे. आता विरोधकांच्या हत्या घडवून आणल्या जात आहे. ही झुंडशाही आहे. ही गुंडशाही आहे. आतापर्यंत अटकेत असलेल्या आरोपीने किती हल्ले केले आणि कुणाच्या सांगण्यावरून केल्या हे गृहमंत्र्यांना माहीत आहे, असंही ते म्हणाले.