एपस्टीन फाइल्स घडू नये म्हणून अमेरिकेला मोदी सरकारकडून खंडणी; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. एपस्टीन फाईल्स उघड होऊ नयेत म्हणून मोदी सरकारने अमेरिकेला खंडणी दिली असून, हा पैसा भारतीय ग्राहकांच्या खिशातून गोळा केला जात आहे, असे राऊत म्हणाले. या फाईल्स उघड झाल्यास देशात राजकीय भूकंप येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

एपस्टीन फाइल्स घडू नये म्हणून अमेरिकेला मोदी सरकारकडून खंडणी; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 11:04 AM

अमेरिकेने एपस्टीन फाइल्स उघडल्यास भारतात मोठा राजकीय भूकंप येईल. तसे होऊ नये म्हणूनच अमेरिकेला प्रोटेक्शन मनी अर्थात खंडणी दिली जात आहे. भारतीय ग्राहकांच्या खिश्यावर डल्ला मारून अमेरिकेची तिजोरी भरली जात आहे, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. आता राऊत यांच्या आरोपांवर भाजप काय उत्तर देतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सूर्य अस्ताला जातोच, असं ट्विट केलं आहे. त्यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. भागवतांचं ट्विट हे मोदी आणि त्यांच्या सरकारला लागू आहे. त्यात लपवयाचं काय? भागवतांनीही मोदींनाच उद्देशून म्हटलं आहे. सूर्य उगवतो, तो मावळतोही. ती सुरवात झाली आहे. ज्या पद्धतीने देशात असंतोषाचं वातावरण तयार झालं आहे, त्यावरून ही सुरुवात झाल्याचं स्पष्ट दिसत आहे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

देश आणि मोदी कोमात

यूपीआय विरोधात लोकांनी बंड केलं आहे. यूपीआयच्या माध्यमातून उकळण्यात येणारा पैसा अमेरिकेला दिला जाणर आहे. ही खंडणी आहे. प्रोटेक्शन मनी आहे. अमेरिकेला देण्यासाठी हा पैसा उकळला जात आहे. एपस्टीन फाईलमधील महत्त्वाच्या फाईल अमेरिकेने ओपन करू नये म्हणून ही खंडणी दिली जात आहे. भारत दबावाखाली आहे. कोमात आहे. मोदीही या विषयावर कधीच कोमात गेले आहेत. त्यामुळेच मोदी बोलत नाही. पूर्वी अंडरवर्ल्डला व्यापारी प्रोटेक्शन मनी द्यायचे. तशीच प्रोटेक्शन मनी अमेरिकेला दिली जात आहे. आम्हाला काही करू नका, हे सांगण्यासाठी केलं जात आहे. एपस्टीन फाईल उघडली तर भारतात भूंकप होईल. तो होऊ नये म्हणून हे सर्व सुरू आहे, असा दावा राऊत यांनी केलाय.

भागवतांना सर्व माहीत

अमेरिकेला प्रोटेक्शन मनी का दिला जात हे हे सर्व भागवतांना माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी सूर्यास्ताबाबत विधान केलं आहे. केंद्र सरकर त्याच दिशेने जात आहे. मोदींना 2029 पूर्वीच जांवं लागणार आहे. देशात सर्वच महाग झालं आहे. पाहा लोक रस्त्यावर उतरणार आहेत. पंतप्रधान निवासापर्यंत जातील, असा इशारा त्यांनी दिला.

तोही माणूसच आहे ना?

मी मोदींच्या कुंडलीवर लिहिलं. त्यावर भाजपला मिर्च्या झोंबल्या. त्यांनी मोदींची खोटी जन्म कुंडली पोस्ट केली. तेवढं तरी करू नका. त्या माणसाचा जन्म झाला ना? ते काय विष्णूचा आवतार आहे का? तोही चुका करतो. तोही थकतो, तोही खोटं बोलतो. तो माणूसच आहे ना? असा सवाल त्यांनी केला.

निवडणूक आयोग घरगडी

यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर पून्हा एकदा टीका केली. निवडणूक आयोग हा अमित शाहांचा घरगडी आहे. घरगडी आहे. अशा पद्धतीने निर्णय देताना त्यांना लाज वाटली पाहिजे. काल काँग्रेसच्या आमदाराला 10-12 वर्षापूर्वीच्या प्रकरणात अटक केली. त्या प्रकरणासाठी जे आंदोलन झालं, त्याचं नेतृत्त्व पश्चिम बंगालच्या आताच्या मुख्यमंत्र्यांनीच केलं होतं. त्या प्रकरणात उमेदवाराला अटक करता? ही लोकशाही आहे मिस्टर मोदी? निवडणूक लढू नये म्हणून उमेदवारांना अटक करता? पश्चिम बंगाल हा भारताचा भाग आहे, मिस्टर मोदी हे लक्षात घ्या, असा हल्लाच त्यांनी चढवला.

इतका बेमुर्वतखोर…

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालवर राज्य केलं. त्या उत्तम चित्रकार आहेत. त्यांनीच ते तीन पानांचं चिन्ह त्यांच्या कुंचल्यातून चित्तारलेलं आहे. ते तुम्ही गोठवता? आमच्यावेळी चिन्ह गोठवा म्हटलं तेव्हा गोठवलं नाही. आता गोठवत आहेत. घड्याळ गोठवत नाही. पण टीएमसीचं चिन्ह गोठवत आहेत. इतका बेमुर्वतखोर आयोग या देशात झाला नाही, अशी टीका त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us