कांजूरची कारशेड कांजूरलाच होणार, कोर्टाने काही आदेश देऊ द्या : संजय राऊत

| Updated on: Dec 18, 2020 | 9:23 PM

उच्च न्यायालयाने कांजूरमार्गच्या कारशेडवर स्थगिती आणली. यावर संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे (Sanjay Raut on Kanjurmarg metro Carshed).

कांजूरची कारशेड कांजूरलाच होणार, कोर्टाने काही आदेश देऊ द्या : संजय राऊत
Follow us on

मुंबई : “मेट्रो कारशेड (Metro Carshed) कांजूरमार्गलाच होणार. तुम्ही काहीही करा, कितीही अडथळे आणा. कोर्टाने काहीही आदेश देऊ द्या. कांजूरमार्गलाच कारशेड होईल. कांजूरचे योगदान मेट्रोसाठी वेगळे आहे”, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. मुंबई मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडवरुन सुरु असलेलं राजकारण संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्य सरकारने कारशेड कांजूरमार्गच्या जागेवर बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाने कांजूरमार्गच्या कारशेडवर स्थगिती आणली. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. या टीकेला संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात प्रत्युत्तर दिलं (Sanjay Raut on Kanjurmarg metro Carshed).

“आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेचा भगवा उतरवा, असं आव्हान दिलं आहे, त्यांच्या छाताडावर उभं राहून भगवा फडकवून दाखवायचा आहे. बाळासाहेबांचं रक्त आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार. पुढील लढाई मुंबई महानगरपालिका आहे. ईशान्य मुंबईत शिवसेनेची ताकद राहिली आहे. विक्रोळी मतदारसंघात सहा जागा जिंकायचं आहे”, असा एल्गार संजय राऊत यांनी पुकारला.

“एकशे पाच आमदारांना घरी बसवले आहे. पुढच्यावेळी विधानसभेत शिवसेनेचे 105 आमदार असतील”, असा दावा राऊत यांनी केला. “मघाशी आपण पगड्या घातल्या. पुणेरी पगडी वेगळी असते पेशव्यांची पगडी वेगळी आहे. ही पगडी म्हणजे संकेत आहे. बाजीराव पेशव्यांनी दिल्लीपर्यंत आपले साम्राज्य नेलं होतं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जायचं आहे. आपला पंतप्रधान व्हायला हवा”, असंदेखीत ते म्हणाले.

“कोरोना संकट काळत शिवसेना खंबीरपणे उभी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना अंमलात आणत काळजी घेण्याच आवाहन केलं. मुख्यमंत्र्यांनी गर्दीत कार्यक्रम करु नका, असं सांगितलं आहे. राज्यात रक्त कमी पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रक्तदान मोठ्या प्रमाणात सुरु झालं”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश

कांजूर कारशेड प्रकरणी 16 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवण्याचे आदेश दिले. तसेच परिस्थिती जैसे थे ठेवण्याचेही आदेश कोर्टाने दिले. हे आदेश देतानाच कोर्टाने येत्या फेब्रुवारीत या प्रकरणावर अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे (Sanjay Raut on Kanjurmarg metro Carshed).