सर्वात मोठी बातमी ! संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय केला दावा?
खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातील 'स्लो पॉयजनिंग'ची धक्कादायक शक्यता वर्तवली आहे. राहुल गांधींनी त्यांना 'टॉक्सिक टेस्ट' करण्याचा सल्ला दिला आहे. समाजात लढणाऱ्यांवर असे प्रसंग येतात आणि सरकार क्रूर असते, असे राऊत म्हणाले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तब्येत बिघडल्याने त्यांना ही शंका आहे.

जे लोक समाजासाठी लढतात. आंदोलन करतात. लोकांसाठी आवाज उठवतात. तुरुंगात असताना त्यांच्या जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता असते. मीच नाही. अनेक लोक तुरुंगात असतात. त्यांच्या खाण्यापिण्यात हे लोक गडबड करू शकतात हा सर्वांना डाऊट आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ही शंका व्यक्त करून मला अलर्ट केलं आहे. त्यांनी मला एक टॉक्सिक टेस्ट करायला सांगितली आहे. मी ती टेस्ट करणार आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
खासदार संजय राऊत काल कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी तुरुंगातून आल्यानंतर मला कॅन्सर झाल्याचं म्हटलं होतं. त्यावर, तुमच्यावर तुरुंगात विषप्रयोग झाला का? असा सवाल राऊत यांना करण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर दिलं. राहुल गांधींनीही याबाबत संशय व्यक्त केला आहे. 10 दिवसापूर्वी मी राहुल गांधींना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी शंका व्यक्त करून मला टॉक्सिक टेस्ट करायला सांगितली. ही टेस्ट करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. तुमच्या सारख्या माणसाला आजार व्हावा हे अनाकलनीय आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ टेस्ट करून घ्या, असं राहुल गांधी म्हणाले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
सरकार क्रूर असतं
सरकार क्रूर असतं. तुरुंगात असताना ते काहीही करू शकतं. काही प्रमुख नेत्यांशी मी चर्चा केली. तुरुंगात असताना प्रकृती खालावलेल्या नेत्यांशीही चर्चा केली. त्यावेळी ही गोष्ट लक्षात आली. या आधी मी त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. तुरुंगात असताना जेवणात विष मिसळलं जाण्याची शक्यता असते. मी तुरुंगातून आल्यावरच हा आजार सुरू झाला, असं राऊत म्हणाले.
काय म्हणाले होते राऊत?
राऊत काल कोल्हापुरात होते. यावेळी त्यांची ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि अमेय तिरोडकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी राऊत यांनी तुरुंगातील परिस्थिती आणि त्यांच्या आजारावर भाष्य केलं होतं. या तुरुंगात चांगल्या घरातील लोकही होते. एका रुममध्ये 10-20 लोक होते. त्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था नव्हती. अंघोळीची व्यवस्था नव्हती. पण जगायचे आहे. राहायचे आहे. कधी सुटका होईल सांगता येत नाही. जेवण नीट मिळत नव्हते. म्हणून सर्व राहत होते. मला तिथूनच कँसरची सुरुवात झाली. मी तुरुंगातून बाहेर आल्यावर आजारी पडलो. त्याचं मूळ तुरुंगात आहे, असं राऊत म्हणाले होते.
तुरुंगात काही लोकांची दृष्टी जाते. आम्ही राहायचो तिथे सूर्याची किरणे येत नसयाची. मी हार्ट पेशंट आहे. सात स्टेन्स आहेत मला. थोडीही सूर्य किरणे यायची नाही. बाजूला सुंदर कोठडी होती. त्यात आम्हाला ठेवायचे नाही. त्या कोठडीत पाण्याचा शॉवर होता. साफसफाई होती. यूरेपियन तुरुंगासाराखी कोठडी होती. ही कोठडी कुणासाठी आहे हे आम्ही विचारलं. त्यावर, विजय मल्ल्या आणि नीरव मोदीसाठी ही कोठडी बनवल्याचं आम्हाला सांगितलं. आम्ही म्हणायचो ते येईपर्यंत आम्हाला ठेवा. मात्र, ब्रिटिश कोर्टाच्या सूचना असल्याने ती कोठडी तशी बनवली होती, असं ते म्हणाले. आमच्या कोठडीत हवा नसायची, पाणी नसायचे. हे केवळ माझ्याबाबत नव्हतं तर सर्वांच्या बाबत होतं. आमच्या सारख्या लोकांचं मानसिक खच्चीकरण करणं अवघड असतं, असं त्यांनी सांगितलं.