शिवाजी महाराज सुरतेवरून गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते; संजय राऊत यांचा गोगावलेंवर हल्ला

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी काल विधानसभा अध्यक्षांसमोर साक्ष दिली. त्यांच्या या साक्षीवरून राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गोगावले यांनी थेट स्वत:ची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारं विधान केलं आहे. शिवाजी महाराज सुरतला गेले होते, म्हणून मीही सुरतला गेलो होतो, असं धक्कादायक विधान भरत गोगावले यांनी केलं आहे. गोगावले यांच्या या विधानावर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

शिवाजी महाराज सुरतेवरून गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते; संजय राऊत यांचा गोगावलेंवर हल्ला
bharat gogawale
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 13, 2023 | 11:47 AM

मुंबई | 13 डिसेंबर 2023 : छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते. तिथलं वातावरण चांगलं आहे. त्यामुळे मीही सुरतला गेलो होतो, अशी साक्ष शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी दिली होती. विधानसभा अध्यक्षांसमोर काल गोगावले यांची साक्ष झाली. यावेळी वकील देवदत्त कामत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोगावले यांनी ही साक्ष दिली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गोगावले यांच्या या विधानावर टीका करण्यात येत आहे. विरोधकांनी गोगावले यांचं हे विधान शिवाजी महाराज यांचा अपमान करणारं असल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या विधानावरून गोगावले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

भरत गोगावले यांचं हे विधान म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते. ते ब्रिटिशांना ईस्ट इंडिया कंपनीला मदत करणाऱ्या गुजराती मंडळाच्या वखारी लुटण्यासाठी. तुम्ही महाराष्ट्र लुटायला तिकडे गेला. तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्या. शिवाजी महाराज गुवाहाटीला गेले नव्हते. शिवाजी महाराज सुरतेवरून गुवाहाटीला रेडे कापायला गेले नव्हते, अशी खवचट टीका संजय राऊत यांनी केली आहे.

गद्दारी आणि बंड यात फरक

गद्दारी आणि बंड यात फरक आहे. गद्दारी आणि बंड यात खूप फरक आहे. गद्दारांनी शिवाजी महाराजांशी स्वत:ची तुलना करू नये. जे खरे बंडखोर असतात ते देशासाठी आणि राज्यासाठी बंड करतात. त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं, असं राऊत म्हणाले.

आधी चीनला हटवा

पाकव्याप्त काश्मीर परत भारतात घेण्यासाठीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पंडित नेहरूंचा विषय काढू नका. ते महान नेते होते. लडाख कुणाच्या कार्यकाळात गेला? लडाखची जमीन कुणाच्या कार्यकाळात गेली? पाकव्याप्त काश्मीर परत भारतात आणण्याची 2014मध्ये तुम्ही गॅरंटी दिली होती. 56 इंचाची छाती दाखवली होती. कधी घेऊन येणार आहात? चीन घुसलाय त्यांना तर बाहेर हटवा, असा टोला त्यांनी लगावला.

यांनी कुणाचं नाक कापलं?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही भरत गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाजी महाराज वखारी लुटायला गेले होते. इंग्रजांच्या वखारी लुटायला गेले होते. यांनी कोणाच नाक कापलं. पन्नास खोक्यांसाठी पळून गेले नव्हते. हे तर गद्दारी करून गेले. शिवाजी महाराज यांची बरोबरी करणारे कोण गोगावले? शिवाजी महाराज यांच्या नखांची बरोबरी करू शकत नाही. हे तर खंडूजी खोपडे, गणोजी शिर्के ,आणि सूर्याजी पिसाळ आहेत, असा हल्ला अंबादास दानवे यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us