देशाच्या टॉप टेन मुख्यमंत्री नाहीत; संजय राऊत खोचकपणे म्हणाले, दिल्लीचे हस्तक असलेल्या व्यक्तीला…

महाराष्ट्राची प्रगती आणि विकास खुंटला आहे. फक्त दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर बसवल्याने महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे. उताराला लागलेली गाडी असते अशी ही उताराला लागलेली गाडी आहे.

देशाच्या टॉप टेन मुख्यमंत्री नाहीत; संजय राऊत खोचकपणे म्हणाले, दिल्लीचे हस्तक असलेल्या व्यक्तीला...
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 13, 2023 | 2:09 PM

मुंबई: देशाच्या टॉप टेन मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव आलेलं नाही. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. त्यामुळेच त्यांचं नाव त्या यादीत नसावं, असं सांगतानाच दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर बसवल्याने महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे, अशी घणाघाती टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत हे माध्यमांशी संवाद साधत होते.

मुळात त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायलाच तयार नाही. पहिल्या दहा जणांमध्येही त्यांचे नाव नाही हे दुर्देव आहे. महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे. जगात राज्याचं महत्त्व होतं. गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र खिजगणतीत नाही. उद्धव ठाकरे पहिल्या पाच आणि चारमध्ये होते. ते पहिल्या क्रमांकावर जात असतानाच सरकार पाडण्यात आलं. महाराष्ट्राचा विकास पाहवत नव्हता. म्हणून ठाकरे सरकार पाडण्यात आलं, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

उताराला लागलेली गाडी

महाराष्ट्राची प्रगती आणि विकास खुंटला आहे. फक्त दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर बसवल्याने महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे. उताराला लागलेली गाडी असते अशी ही उताराला लागलेली गाडी आहे. म्हणून महाराष्ट्र शिखरावर निघाला होता तो परत खाली कोसळताना दिसतो.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या दहामध्ये नाहीत याचं वाईट वाटलं पाहिजे मिंधे गटाला आणि भाजपला. पण त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील हे फार दुर्देव आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.

म्हणूनच नाव नाही

आज महाराष्ट्राशिवाय राष्ट्र चालवणं सोपं आहे हे दिल्लीचं तख्त दाखवून देतोय. म्हणूनच एकनाथ शिंदे हे पहिल्या दहा मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाहीत, अशी जहरी टीकाही त्यांनी केली.

कोर्ट विकत घेतलंय का?

देवेंद्र फडणवीस, मिंधे गटाचे आमदार, मंत्री, नारायण राणे ज्या प्रकारची वक्तव्ये करतात त्यावरून या लोकांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय विकत घेतला काय असं विचारावसं वाटतं. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. सर्वोच्च न्यायालय स्वायत्त आहे.

या दोघांचे निकाल शिंदे गटाच्या बाजूने येतील. तुम्ही आनंदोत्सव साजरा करण्याच्या कामाला लागा, असे आदेश हे नेते देत आहेत. याचा अर्थ त्यांनी निवडणूक आयोग आणि कोर्टाला विकत घेतलं आहे का? म्हणून आम्ही लोकांना सावध केलं. पाहा अजून निकाल लागायचा आहे. त्या आधी त्यांनी जाहीर केलं. निकाल आमच्या बाजूने लागेल, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us