भारतीय वाघिणींचा धमाका; आठव्यांदा महिला आशिया कप जिंकला, बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीत श्रीलंका चितपट
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया चषक २०२६ चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये दमदार कामगिरी करत श्रीलंकेला मात दिली. त्यामुळे टीम इंडियाने महिला आशिया चषकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ACC महिला आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 72 धावांनी धुव्वा उडवत भारताने तब्बल 8व्यांदा महिला आशिया चषकाचे विजेतेपद आपल्या नावावर केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 183 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरादाखल 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 20 षटकांत 111 धावांवर गारद झाला. दरम्यान, भारताने 2004, 2005, 2006, 2008, 2012, 2016, 2022 आणि आता 2026 अशा आठवेळा महिला आशिया कप जिंकला आहे.
शेफाली अन् स्मृतीचे वादळी अर्धशतक
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला सलामीवीरांनी भक्कम सुरुवात करून दिली. सलामीवीर शेफाली वर्माने अवघ्या 39 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 68 धावांची स्फोटक खेळी खेळली. तिला उत्तम साथ देत स्मृती मानधनानेही 39 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 59 धावा ठोकल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने 14 धावा आणि विकेटकीपर रिचा घोषने 17 धावा जोडल्या. अखेरच्या षटकांमध्ये जी. कमलिनीने अवघ्या 5 चेंडूंत नाबाद 15 धावा केल्याने भारताला 183 धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेकडून मिताली अयोध्या, चामुडी प्रबोधा आणि चमारी अटापट्टू यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली
184 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर इमेशा दुलानी अवघ्या 4 धावांवर बाद झाली. कर्णधार चमारी अटापट्टूने 36 धावा, विशमी गुणरत्नेने 20 धावा आणि नीलाक्षिका सिल्वाने 22 धावा करत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र संथ फलंदाजीमुळे श्रीलंकेवरील दडपण वाढत गेले आणि संपूर्ण संघ 111 धावांत आटोपला.
श्री चरणी अन् दीप्तीची घातक गोलंदाजी
भारताच्या विजयात गोलंदाजांनी मोलाचा वाटा उचलला. फिरकीपटू श्री चरणीने घातक गोलंदाजी करत सर्वाधिक 4 बळी घेतले, तर दीप्ती शर्माने 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय क्रांती गौड, शेफाली वर्मा आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवत भारताच्या या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
