कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद सोडवण्यासाठी आता शरद पवार मैदानात, गरज पडली तर मोदींनाही भेटणार

| Updated on: Dec 20, 2020 | 5:55 PM

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या प्रश्नावर वादावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार आहेत. (Sharad Pawar kanjurmarg carshet)

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद सोडवण्यासाठी आता शरद पवार मैदानात, गरज पडली तर मोदींनाही भेटणार
Follow us on

मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रोकारशेड प्रकल्पाच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता विरोधक आणि ठाकरे सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. हा वाद शमण्याचे चिन्ह दिसत नसल्याने आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी मोठी भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्याशी बोलून काहीतरी मार्ग काढण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. तशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Sharad Pawar will meet to Narendra Modi for solving kanjurmarg metro carshed dispute)

उद्धव ठाकरे-शरद पावर चर्चा

कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. न्यायालयाने काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर कात्रीत सापडल्यासारखी राज्य सरकारची स्थिती झाली. ठाकरे सरकारसाठी हा मुद्दा आता प्रतिष्ठेचा होऊन बसला आहे. त्यावर ठोस आणि निर्णायक तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. यावेळी कांजूरमार्ग कारशेडवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती सांगताना “मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. कारशेडबाबत कुठे तरी एकोपा निर्माण करायला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. तसेच, वाद सोडून कुठलाही मार्ग निघाला तर बघायला हवं अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली,” अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

पवार मोदींनी भेटणार

कांजूरमार्ग येथील कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. “शरद पवार कांजूरमार्ग कारशेड प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर ते एक किंवा दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील भेटतील. या मुद्द्यावर पवार मोदींशी चर्चा करतील,” अशी माहिती मलिक यांनी दिली. तसेच, मुंबईच्या विकासात अडथळा नको यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही प्रयत्न करत आहेत. या सर्वांत शरद पवार मद्यस्थी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच; आदित्य ठाकरेंचा दावा

भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी दिलेलं शपथपत्र कसं नाकारता?, राजीव सातव यांचा केंद्राला सवाल

‘मेट्रोचं काम थांबवण्यासाठी भाजपचं कटकारस्थान’, कारशेडच्या वादावरुन नवाब मलिकांचा गंभीर आरोप

(Sharad Pawar will meet to Narendra Modi for solving kanjurmarg metro carshed dispute)