शाईच्या पेनवरील बंदीचा भेदरट निर्णय घेण्यापेक्षा मंत्र्यांची… ‘सामना’तून सत्ताधाऱ्यांवर टीका काय?

| Updated on: Dec 21, 2022 | 7:02 AM

सरकारला जनतेत मिसळावेच लागते. मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना जनतेत जाऊन संवाद करावाच लागतो. मग शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार?

शाईच्या पेनवरील बंदीचा भेदरट निर्णय घेण्यापेक्षा मंत्र्यांची... सामनातून सत्ताधाऱ्यांवर टीका काय?
शाईच्या पेनवरील बंदीचा भेदरट निर्णय घेण्यापेक्षा मंत्र्यांची... 'सामना'तून सत्ताधाऱ्यांवर टीका काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान शाईचा पेन घेऊन येण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे. कुणीही आतमध्ये शाईच्या पेनासह प्रवेश करू नये म्हणून येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे. राज्य सरकारने शाईच्या पेनचा धसका घेतल्याने त्यावरून दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. शाईच्या पेनवरील बंदीचा भेदरट निर्णय घेण्यापेक्षा मंत्र्यांची आचरट विधाने थांबवा, असं आवाहन करतानाच राज्यातील सरकार मिंधे तर आहेच, पण आता ते धसका सरकारही बनलंय, अशी खोचक टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

राज्यातील सरकार मिंधे तर आहेच. पण आता ते धसका सरकारही बनले आहे. शाई हल्ल्याच्या भीतीने विधिमंडळ आवारात शाईच्या पनेवर बंदी घालण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय भेदरटच म्हणावा लागेल. शाईवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणार नाही अशी आचरट विधाने मंत्री आणि सत्तापक्षाच्या नेत्यांनी टाळली पाहिजे. तसे केले तर बंदीचे घाबरट निर्णय घेण्याची वेळ धसका सरकारवर येणार नाही, असं अग्रलेखातून म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

अग्रलेखातील आणखी टीका काय?

लेखणीत वापरली जाणारी शाई म्हणजे जणुकाही एके-47 बंदुका किंवा आरडीएक्ससारखे विस्फोटक आहे, अशी भीती राज्यातील भाजप पुढारी व मिंधे सरकारच्या मनात घर करून बसली आहे.

अशा प्रकारे पेन वगैरे तपासणे हा पोरकट प्रकार आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर किंवा कुठल्याही नेत्यावर अशा प्रकारची शाईफेक होणे हे वाईटच. अशा घटनांचे समर्थन कदापि करता येणार नाही. मात्र शाईफेक करणे हे जसे चुकीचे आहे, तसेच विधिमंडळाच्या आवारात शाईचे पेन आणण्यावर बंदी घालणे हेदेखील चुकीचेच.

आधी तोंडाला येईल ते बरळायचे, जनतेच्या मनातील श्रद्धास्थानांवर आघात करायचा, महापुरुषांची वाटेल तशी बदनामी करायची आणि नंतर धसका घेऊन शाईच्या पेनवर बंदी घालण्याचे भेदरट निर्णय घ्यायचे, यालाच राज्यकारभार म्हणावे काय? शाईवर किंवा पेनवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणारच नाही असा कारभार करायला काय हरकत आहे!

सरकारला जनतेत मिसळावेच लागते. मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना जनतेत जाऊन संवाद करावाच लागतो. मग शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार? त्यामुळे असे शाईबंदीचे उफराटे निर्णय घेण्यापेक्षा उफराटी विधाने करणाऱ्या पुढाऱ्यांच्या बेलगाम बोलण्यावर खरे तर बंदी घालायला हवी.

भाज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही छत्रपती शिवरायांचा अपमान केला. प्रसाद लाड यांनीही अशीच बडबड केली. सरकार पक्षानेच महाराष्ट्रातील महापुरुषांची निंदानालस्ती करून महाराष्ट्राची बदनामी चालवल्याने मराठी अस्मिता दुखावली.

मराठी मने पेटली व त्याची धग विराट महामोर्चाच्या रूपाने मुंबईच्या रस्त्यांवर 17 डिसेंबर रोजी दिसली. मात्र या संतापाचा लाव्हा सरकारने अजून ओळखलेला दिसत नाही.