मला घटस्फोट हवा! बायकोचे शब्द ऐकताच नवरा बिथरला, नको त्या थराला पोहोचला, मुलूंड स्थानकात भयंकर घडलं?

मुंबईच्या मुलुंड स्टेशनवर एका नवऱ्याने आपल्या पत्नीला लोकल ट्रेनसमोर ढकलले, ज्यात तिचा मृत्यू झाला. त्यांच्या १३ वर्षांच्या मुलाने ही भीषण घटना पाहिली. नेमकं काय घडलं होतं वाचा...

मला घटस्फोट हवा! बायकोचे शब्द ऐकताच नवरा बिथरला, नको त्या थराला पोहोचला, मुलूंड स्थानकात भयंकर घडलं?
सांकेतिक फोटो
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 17, 2026 | 3:22 PM

नवरा आणि बायकोचे नाते हे थोडं वेगळं असतं. या नात्यात दोघांमध्ये कधी भांडणे होतात तर कधी गोडी गुलाबीने एकत्र राहून ते संसार करतात. पण कधीकधी रागाच्या भरात नवरा किंवा बायको टोकाचे पाऊल उचलतात. मुलूंड रेल्वे स्थानकातील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशनवर शनिवारी एका पतीने आपल्या पत्नीला वेगवान लोकल ट्रेनसमोर ढकलून तिची हत्या केली. दोघांमध्ये नेमकं काय झालं होतं जाणून घ्या…

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी राजू गुप्ता (४२) याने १३ वर्षांच्या लहान मुलासमोर पत्नीला ट्रेनखाली ढकलले. मुलाने संपूर्ण घटनाक्रम पाहिला. हत्येनंतर राजू आपल्या मुलासोबत सूरत येथे पळून गेला. तेथून सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) त्याला अटक केली. राजू गुप्ता हा व्यावसायिक इलेक्ट्रिशियन होता. त्याची पत्नी पुष्पा यांच्याशी नेहमीच भांडणे होत असत. घरगुती भांडणे इतकी वाढली की, पुष्पाने १३ फेब्रुवारीला मुलुंड पोलिस ठाण्यात राजूविरुद्ध नॉन-कॉग्निजेबल (एनसी) तक्रार दाखल केली. काही दिवसांनंतर पुष्पा आपल्या मोठ्या मुलासोबत (१५ वर्षे) उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी गेली. तिचा मुंबईत परत न येण्याचा इरादा होता, कारण मोठा मुलगा यूपीमधूनच इयत्ता १०वीची बोर्ड परीक्षा देणार होता. लहान मुलगा राजूसोबत मुंबईतच राहिला.

भावाने मध्यस्थी केली

काही काळानंतर पुष्पाच्या भावाने कमलेश कुमार याने सुट्टीत घरी येऊन दोघांमधील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. कमलेश भारतीय सेनेत जवान आहे. त्याने पुष्पा आणि मोठ्या मुलाला मुंबईत परत आणले. हे सर्व १४ मार्चला घडले. पण मुंबईत परतल्यानंतरही घरातील भांडण थांबले नाही. पुन्हा भांडण झाल्यावर पुष्पाने राजूविरुद्ध दुसरी एनसी तक्रार दाखल केली आणि तिने आपल्या भावासोबत आणि मोठ्या मुलासोबत मुंबई सोडून जाण्याचा निर्णय घेतला.

स्टेशनवर सुरू झालेले शेवटचे भांडण

पुष्पा, कमलेश आणि मोठा मुलगा मुलुंड स्टेशनवर पोहोचले. कळवा येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी लोकल ट्रेनचे तिकीट काढले. प्लॅटफॉर्मवर कमलेशने आपले पाकीट तपासले तर त्यातील एटीएम कार्ड, पॅन कार्ड आणि आर्मी आय-कार्ड गायब असल्याचे लक्षात आले. त्याने ताबडतोब राजूला फोन केला. राजूने कबूल केले की सर्व कार्ड त्याच्याकडे आहेत. कमलेशने पुष्पाला स्टेशनवर थांबण्यास सांगितले आणि मोठ्या मुलासोबत कार्ड घेण्यासाठी घरी परतला.

भावाला आणि मुलाला घरात बंद केले

घरी पोहोचताच राजू आणि कमलेशमध्ये जोरदार वाद झाला. वाद मारामारीपर्यंत पोहोचला. राजूने लहान मुलाच्या मदतीने कमलेश आणि मोठ्या मुलाला खोलीत बंद केले. नंतर स्वतः लहान मुलासोबत बाहेर पडला. कमलेशने आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढले. कमलेश थेट मुलुंड पोलिस ठाण्यात गेला आणि राजूविरुद्ध तक्रार दाखल केली की त्याने महत्वाचे कागदपत्रे चोरली आहेत. पोलिसांनी राजूला ठाण्यात बोलावले, पण राजूने फोन बंद केला.

पत्नीला ट्रेनसमोर ढकलले

याचदरम्यान राजू आणि त्याचा १३ वर्षांचा मुलगा थेट मुलुंड स्टेशनवर पोहोचले. त्यांनी पुष्पाला मनवण्याचा प्रयत्न केला की ती मुंबईतच राहावी. पण पुष्पाने स्पष्ट सांगितले की आता ती छळ सहन करू शकत नाही आणि तिला घटस्फोट हवा आहे. या बोलण्यावर संतापलेल्या राजूने पुष्पाला कल्याणला जाणाऱ्या डाउन लोकल ट्रेनसमोर ढकलले. पुष्पाचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर राजू लहान मुलासोबत स्टेशन गेला आणि तेथून ट्रेन पकडून सूरतला पळून गेला.

सूरतमधून अटक

GRP च्या टीमने त्वरित कारवाई करून राजूला सूरत येथून अटक केली. पोलिसांनी सांगितले की लहान मुलगा आरोपीसोबतच होता आणि त्याने संपूर्ण घटना डोळ्यांनी पाहिली. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Follow Us