ठाकरे सरकारकडून राजकारणाचे गुन्हेगारीकरण; आशिष शेलारांनी केला आघाडीचा पंचनामा

| Updated on: Nov 16, 2021 | 6:35 PM

राज्यातील ठाकरे सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू केले आहे. या सरकारने गुन्ह्यांचे, गुन्हेगारांचे, दहशतवाद्यांचे आणि फुटीरतावाद्यांचे समर्थन करायला सुरवात केली आहे.

ठाकरे सरकारकडून राजकारणाचे गुन्हेगारीकरण; आशिष शेलारांनी केला आघाडीचा पंचनामा
आशिष शेलार, आमदार, भाजप
Follow us on

मुंबई: राज्यातील ठाकरे सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू केले आहे. या सरकारने गुन्ह्यांचे, गुन्हेगारांचे, दहशतवाद्यांचे आणि फुटीरतावाद्यांचे समर्थन करायला सुरवात केली आहे. ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील हिंदू धर्म आणि महाराष्ट्र धर्मावर घाला घालण्यात येत आहे. त्या विरोधात भाजपा संघर्ष करेलच, जनतेनेही हा घाला परतवून लावायला हवा, असं आवाहन भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं.

दादरमध्ये आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी आशिष शेलार यांनी “राजकारणाचे गुन्हेगारीकरण” या विषयावर आपले विचार मांडले. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कालखंडाचा पंचनामा करत हे सरकार महाराष्ट्र धर्म आणि हिंदू विरोधी असल्याची खरमरीत टीका केली. ठाकरे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्यांदा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला. त्यानंतर आणीबाणी सारखी अघोषित परिस्थिती निर्माण केली गेली. त्यानंतर मात्र ठाकरे सरकारच्या दोन वर्षांचे वर्णन करायचे झाले तर प्रथम गुन्हयांचे समर्थन करण्यात आले. तर पुढच्या टप्प्यात गुन्हेगारांचे समर्थन करण्यात आले. त्यानंतर आतंकवादाचे समर्थन करण्यात आले. नंतर फुटीरतावाद्यांचेही समर्थन करण्यात आले आणि आता चौथ्या टप्प्यात ठाकरे सरकारकडून अराजकतावाद्यांचे समर्थन आणि संरक्षण करण्यात येते आहे, असा आरोप शेलार यांनी केला.

एवढी मालमत्ता कुठून आली?

गुन्हेगारीचे समर्थन कसे केले जात आहे हे सांगताना त्यांनी काँग्रेसच्या अमरावतीच्या मंत्र्यांनी एका पोलीस शिपायाला मारले त्यांच्यावरचा गुन्हा सिध्द झाला पण त्यांच्या राजीनाम्याबाबत कोणी काहीही बोलत नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईक आणि जवळच्यांवर छापे पडले करोडोची बेनामी मालमत्ता सापडल्याचे व केंद्रीय यंत्रणा सांगते आहे. ही मालमत्ता कुठून आली? याबाबत कोणी बोलत नाही. बीडच्या मंत्र्यांबाबत काय सांगावे?, असा सवाल त्यांनी केला.

घोटाळेच घोटाळे

अहमदनगरच्या एका मंत्र्यांच्या पीएने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. पण त्या मंत्र्यांना कोणी दोष देण्यास तयार नाही. नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्यांने संबंधित मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी ऐकली नाही. एका मत्र्यांने खासगी विमान वापरल्याबाबत याचिका झाली. मंत्री दोषी आढळले. त्याबाबत कोणी काही बोलत नाही. चंद्रपूरच्या एका मंत्र्यांचे दोन पासपोर्ट सापडले तर परिवहन मंत्र्यांचे म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याचे उघड झाले. गृहनिर्माणमंत्र्या विषयी एका अभियंत्याने सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिली तर त्याला मंत्र्यांच्या अंग रक्षकांनी बेदम मारहाण केली. मंत्र्यांना अटक कधी झाली, सुटका कधी झाली कळले नाही. पण सरकार काही बोलायला तयार नाही, अशा शब्दात शेलार यांनी ठाकरे सरकारचा पंचनामा केला.

आरोपींशी मंत्र्यांचे आर्थिक व्यवहार

एक मंत्री तर 1993च्या बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी असलेल्या याकूब मेमनच्या फाशीचा विरोधक आहे. तर अल्पसंख्याक मंत्री तर दाऊची बहीण हसीना पारकरचा कट्टर समर्थक असलेल्या सलीम पटेल सोबत आर्थिक व्यवहार करतात. 1993च्या बाँम्ब स्फोटातील शिक्षा भोगत असलेला आरोपी सरदार शहावली खान सोबत मंत्री आर्थिक व्यवहार करतात. मुख्यमंत्री याबाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत. शर्जिल उस्मानीला रेडकार्पेट घातले जाते. आझाद काश्मिरचा बोर्ड फडकवणाऱ्या मेहक प्रभूवरील गुन्हा मागे घेतला जातो, असं ते म्हणाले.

हिंदू सुरक्षित नाही

कायदा, फौजदारी दंड संहिता, भारतीय दंड संहिता आणि संविधान हे सर्व मोडित काढण्याचे काम ठाकरे सरकारकडून करण्यात येत आहे. या राज्यातील तक्रारदार सुरक्षित नाही. तपास अधिकारी, साक्षीदार सुरक्षित नाही. तर पोलीसांना वसूलीची कामे दिली जात आहेत. ज्या रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदलीतील भ्रष्टाचार उघड केला. त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत. सीबीआयच्या प्रमुखांना मागच्या कुठल्या तरी घटनेत बोलावून घेतले जात आहे. असे भयाण चित्र महाराष्ट्रात आहे. दुसरीकडे पालघरमध्ये सांधूंना मारले जाते, गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवावर बंदी आणली जाते. वारकऱ्याला पंढरपूरात जाऊ दिले जात नाही. राम मंदिराच्या तारखेची आणि राम वर्गणीची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदू सुरक्षित नाही तसाच महाराष्ट्र धर्मही सुरक्षित नाही, असंही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात कायद्याचे नाही तर ‘काय ते द्या’चे राज्य; भ्रष्टाचार, वसुलीच्या आरोपासह फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

आघाडी सरकारविरोधात एल्गार पुकारावाच लागेल, रस्त्यावर उतरावेच लागेल; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू; फडणवीसांची राऊतांवर जळजळीत टीका!