‘शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजी, आमदार पळून जाण्याची भीती’, विरोधी पक्षनेत्याचा सर्वात मोठा दावा

| Updated on: Jun 05, 2023 | 7:12 PM

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मोठा दावा केला आहे. त्यांनी शिवसेना आणि भाजपवर सडकून टीका केलीय.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजी, आमदार पळून जाण्याची भीती, विरोधी पक्षनेत्याचा सर्वात मोठा दावा
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. राज्य सरकारला आपला कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे दिल्लीत काल मंत्रिमंडळाच्या विस्तारावर खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत दिले आहेत. असं असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असा दावा केला आहे. सत्ताधारी पक्षांना आमदार पळून जाण्याची भीती असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. सरकारकडून फक्त वेळकाढूपणा केला जाईल, असा दावा अंबादास दानवे यांनी केलाय.

“मंत्रिमंडळ विस्तारात किती जागा भेटतील याचा आधी विचार करुन ठेवा. कित्येक लोक म्हणतात की यांना आता भाजपच्या चिन्हावर लढावं लागणार आहे. भाजप हेच करणार आहे. लढा पण आमच्या चिन्हावर लढा. असे अनेक अनुभव आलेले आहेत. कॅबिनेटचा विस्तार हे करत करतच राहून जातील”, असं अंबादास दानवे म्हणाले.

‘मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता फार कमी’

“सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आमदारांना सांभाळायचं आहे, मग अशा घोषणा करा. आता अधिवेशन येतंय. अधिवेशनआधी होईल सांगत आहेत. नंतर पुन्हा वेळेवर सांगतील की, अधिवेशन झाल्यावर करु. पण मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता फार कमी आहे. ते फक्त घोषणाबाजी करत आहेत”, असंदेखील दानवे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, अहमदनगरमध्ये एका मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन काही तरुणांनी नृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणावरुनही अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

“हे सगळे नुसते बोलबच्चन लोकं आहेत. औरंगजेबाचा फोटो घेऊन काल लोकं नाचत होते. दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये औरंगजेबचा फोटो घेऊन लोकं नाचत होते. हे स्वत:ला मोठे हिंदुत्ववादी समजून घेतात. औरंगजेबाचं लोक एवढं उदात्तीकरण करत आहेत. यांनी काय कारवाई केली? हे फार हिंदुत्ववादी आहेत ना?”, असे सवाल दानवे यांनी केले.

“अहमदनगरमध्ये एका ठिकाणी 17 वर्षीय मुलीला राहत्या घरातून उचलून नेलं. पीडित मुलीच्या आई-वडिलांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस आंदोलन करावं लागलं. अजूनही त्या मुलीचा तपास लागलेला नाही. सुरुवातीला पोलीस ठाण्या गुन्हा दाखल होत नव्हता. मुलीचे आई-वडील उपोषणाला बसले आहेत. सरकार कसलं हिदुत्ववादी आहे? हे सरकार औरंगजेबाचं उदात्तीकरण करतं. हे सरकार त्यांना अटक करणार नाही”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.