Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाची झळ मुंबईपर्यंत! कांदिवलीच्या दीक्षितचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू

Iran Israel War: इस्त्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर हल्ला केला. इराणमधील 30 महत्त्वाच्या ठिकाणांवर हे हल्ले झाले. त्यानंतर इराणने देखील उत्तर देण्यासाठी अनेक आखाती देशांमधील अमेरिकेची लष्करी तळे उद्ध्वस्त केली. इराणने केलेल्या एका ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या तरुणाला जीव गमवावा लागला आहे.

Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाची झळ मुंबईपर्यंत! कांदिवलीच्या दीक्षितचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू
Oman Ship Attack
Image Credit source: Reuters
| Updated on: Mar 04, 2026 | 2:07 PM

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांनी मिळून इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे नव्या युद्धाला तोंड फुटले आहे. या युद्धाची झळ ही इतर देशांप्रमाणे भारतालाही लागत आहे. विशेषत: मुंबईला बसली आहे. या युद्धामुळे मुंबईतील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणासोबत नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया…

इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाची आणि युद्धजन्य स्थितीची थेट झळ आता मुंबईला बसली आहे. ओमानच्या मस्कत किनारपट्टीजवळ, गल्फ ऑफ ओमानमध्ये एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या ड्रोन (unmanned surface vessel) हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी दीक्षित सोलंकी (वय २५) याचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला इराण-इस्रायल संघर्षाशी संबंधित असल्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे.

दीक्षित सोलंकीचा मृत्यू

मूळचा दीव (गुजरात) येथील असलेला दीक्षित सोलंकी काही वर्षांपूर्वी व्यवसायासाठी मुंबईत आला होता आणि कांदिवली परिसरात राहत होता. तो ‘MKD Vyom’ या मार्शल आयलंड्स ध्वज असलेल्या ऑईल टँकरवर क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून सुमारे ५२ नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या या टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने (unmanned boat) हल्ला झाला. या हल्ल्यात टँकरच्या इंजिन रूममध्ये भीषण स्फोट आणि आग लागली, ज्यात दीक्षितचा जागीच मृत्यू झाला.

दीक्षित हा दीव येथील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सोलंकी यांचा धाकटा मुलगा होता. महिनाभरापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यसंस्कारानंतर तो पुन्हा जहाजावर कर्तव्याला परतला होता, पण दुर्दैवाने काळाने त्याला गाठलं.

इतर दोन भारतीय खलाशांबाबत चिंता

या घटनेपूर्वी एका दिवस आधी, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत ‘MV Skylight’ या जहाजावरही हल्ला झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात बिहारचा आशिष कुमार आणि राजस्थानचा दलीप सिंग हे दोन भारतीय खलाशी गेल्या ४८ तासांपासून बेपत्ता आहेत. शोधकार्य सुरू असून, त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनांमुळे आतापर्यंत तीन भारतीय खलाशांचे बळी गेल्याची शक्यता आहे.

Follow Us