संजय राऊत घरचा माणूस, नरेंद्र मोदी मोठे बंधू : मुख्यमंत्री

| Updated on: Mar 03, 2020 | 1:31 PM

प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेण्यासाठी येत्या सात मार्चला अयोध्येला जाणार आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी यावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं Uddhav Thackeray on Saamana Editor

संजय राऊत घरचा माणूस, नरेंद्र मोदी मोठे बंधू : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : संजय राऊत घरचा माणूस आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच आहे. ‘सामना’तील भाषा ही आमची पितृभाषा आहे. ‘सामना’च्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे  गेली, तरी ‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. (Uddhav Thackeray on Saamana Editor)

‘मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अनपेक्षित आली. सामना, शिवसेना आणि ठाकरे ही तिन्ही नावं वेगळी होऊ शकत नाहीत. म्हणून रश्मी ठाकरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. संजय राऊत आमच्या घरातले आहेत. संपादकीय विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे कायम राहील’ असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. विधानभवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेण्यासाठी येत्या सात मार्चला अयोध्येला जाणार आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी यावं. मात्र देवदर्शनात राजकारण नको, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

डिसेंबरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली होती. 15 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करणारच, एनपीएची अडचण नाही. सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्त करु. गेल्या दोन महिन्यात दोन याद्या जारी केल्या. विदर्भातील पाच लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी तयार आहे, मात्र गडचिरोली, अमरावती, नंदुरबारसारख्या जिल्ह्यांतील स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जाहीर केली नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 10 लाख शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण झाले आहे, 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.


दोन महिन्यांत शेतकऱ्यांनी संयम सोडला नाही. त्यांना पूर्वीप्रमाणे हेलपाटे मारावे लागले नाहीत. त्यांना रांगेत उभं राहावं लागलं नाही. ही योजना पूर्ण करुन पुढील योजना आणणार आहे, असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिलं. ‘काही जणांना चारशे महिने कर्जमाफी चालेल अस वाटतंय. त्यांच्यासाठी काही मिनिटांचा महिना करावा लागणार आहे. कर्जमाफी वेग पकडत आहे’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

मराठा आरक्षणावर सरकार न्यायालयात ताकदीने लढत आहे. मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अजून आला नाही. त्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. मुस्लिम आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री किंवा शिवसेना म्हणून मी कोणतीही भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. ज्यावेळी मुद्दा येईल त्यावेळी बोलेन. नम्रपणे सांगतो, जे आदळआपट करत आहेत, त्यांनी ताकद वाया घालवू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

भाजपला माझा प्रश्न आहे की त्यांनी गोरक्षा इतर राज्यात लागू करा आणि त्यानंतर माझ्याशी बोला, असं चॅलेंजही मुख्यमंत्र्यांनी दिलं. एनआरसी आणि एनपीआरबद्दल दिशा ठरवण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांची एक समिती नेमण्यात येणार आहे.  सीएए आणि एनआरसीमुळे राज्यातील एकाही नागरिकाचं नागरिकत्व हिरावू देणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे बंधू आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या विचारावर भाष्य करण्यास नकार दिला.

हेही वाचा : तुमची मुलं इंग्रजी शाळेत का शिकली? विधानपरिषदेत उद्धव ठाकरे म्हणतात…

Uddhav Thackeray on Saamana Editor