रामलल्लाचं फुकट दर्शन नको, बेरोजगारीवरुन संजय राऊत यांनी मोदी सरकारला घेरले

MP Sanjay Raut | देशातील तरुणांच्या हाताला काम नाही. तरुण नोकरीसाठी वणवण फिरत आहे. त्यांना मोदी सरकार पकोडे तळायला सांगत असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घातला. पंतप्रधान आज सोलापूर दौऱ्यावर असताना राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

रामलल्लाचं फुकट दर्शन नको, बेरोजगारीवरुन संजय राऊत यांनी मोदी सरकारला घेरले
MP Sanjay Raut On Narendra Modi
| Updated on: Jan 19, 2024 | 11:21 AM

मुंबई | 19 जानेवारी 2024 : देशात बेरोजगारीचा मुद्दा पुण एकदा तापला आहे. याविषयीचे विविध अहवाल आल्यानंतर आता विरोधक केंद्रासह राज्य सरकारवर तुटून पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. देशात बेरोजगारीची समस्या आ वासून उभी ठाकली असताना, मोदी सरकार तरुणांना पकोडे तळायला सांगत आहे. देशाची 88 टक्के जनता नोकरीच्या शोधात आहे, असे अहवाल अधिकृतपणे सांगतो, याचा अर्थ नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात काय केलं, असा रोकडा सवाल त्यांनी केला.

दोन कोटी नोकऱ्यांचे काय झाले

देशातील 88 टक्के जनता जर नोकरीच्या शोधात आहे, असे अहवाला आधारे सांगत त्यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळावर बोट ठेवले. या काळात नोकऱ्या का निर्माण झाल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची भाषा केली होती, याची त्यांनी आठवण करुन दिली. मोदी सरकार पदवीधर तरुणांना पकोडे तळायला सांगत असल्याची खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली.

रामलल्लांचे फुकट दर्शन

मोदी सरकार नोकरी मागणाऱ्यांना रामलल्लांचे फुकट दर्शन देत आहे. आम्हाला रामल्लांचे फुकट दर्शन नको, आम्हाला नोकरी हवी आहे. तरुण देशाच्या पंतप्रधानांकडे नोकऱ्या मागत असल्याचा चौफेर हल्ला त्यांनी यावेळी पंतप्रधानांवर चढवला. या देशातील 88% जनता जर नोकरीच्या, रोजगाराच्या शोधात असेल तर हा संपूर्ण देशच बेरोजगार झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधानांना सातत्याने प्रचारासाठी यावे लागते

भारताचे पंतप्रधान महाराष्ट्रात फार मोठ्या उदात्त हेतूने येत नाही. त्यांना सातत्याने प्रचारासाठी महाराष्ट्रात यावे लागते, असा चिमटा ही राऊत यांनी काढला. मोदी हे उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येतील राम मंदिराचा दृष्टीने प्रचार करत आहेत आणि महाराष्ट्रमध्ये येऊन येऊन राजकीय प्रचार करत आहेत. त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा धसका घेतल्याचे ते म्हणाले. राज्यातील 48 लोकसभेच्या जागेवर पुन्हा एकदा मोदी हेच प्रचार करतील, असा उपरोधीक टोला ही त्यांना हाणला.