आता महाविकास आघाडीही वात पेटवणार, फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार; नाना पटोलेंचा इशारा

| Updated on: Sep 20, 2021 | 4:35 PM

भाजप नेत्यांनी आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे काढण्यास सुरुवात केल्याने आघाडी सरकारचे अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता आघाडी सरकारनेही भाजप विरोधात वात पेटवण्याचा निर्णय घेतला आहे. (nana patole)

आता महाविकास आघाडीही वात पेटवणार, फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार; नाना पटोलेंचा इशारा
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us on

मुंबई: भाजप नेत्यांनी आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे काढण्यास सुरुवात केल्याने आघाडी सरकारचे अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता आघाडी सरकारनेही भाजप विरोधात वात पेटवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा इशाराच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. (we will expose bjp’s corruption, says nana patole)

नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. महाविकास आघाडी एकत्र येऊन फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार आहे. तशी वेळच आता आली आहे, असं पटोले म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या रस्ते घोटाळ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाटील यांनी स्वत: खाल्ले. पण दिसून आले नाही. किती खाल्ले ते त्यांनी सांगून जावे, असंही ते म्हणाले.

सोमय्यांचा स्टंट

भाजप लोकांची दिशाभूल करत आहेत. लोकांचं प्रश्न सोडवत नाही. केंद्र सरकारवर जनतेची नाराजी आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची नौटंकी सुरू आहे. म्हणूनच किरीट सोमय्या स्टंट करत आहेत. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचं काम भाजप करत आहेत, असं सांगतानाच काँग्रेस चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला गांभीर्याने घेत नाही. तसेच आमच्या मंत्र्यांची चूक नसल्याने आम्हाला घाबरण्याचं कारणही नाही, असं ते म्हणाले.

ते विधान गंमतीने

मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात विरोधकांना भावी सहकारी म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. एखाद्या गोष्टीची गंमत करणं, जोक करणं हा मुख्यमंत्र्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांनी गंमतीत ते विधान केलं असावं, असं ते म्हणाले.

तर सोमय्यांना जनतेचे आशीर्वाद मिळेल

किरीट सोमय्यांनी भाजप नेत्यांचेही भ्रष्टाचार उघड करावेत. त्यांना महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद मिळतील. सोमय्या जे कागद घेऊन फिरत आहेत ते जुनेच आहेत, असं सांगतानाच सोमय्यांना साधं निवडणुकीचं तिकीटही भाजपनं दिलं नव्हतं, असा चिमटाही त्यांनी काढला.

राज्यसभेचा उमेदवार आजच जाहीर करणार

दरम्यान, राज्यसभेचा उमेदवार आज संध्याकाळीच जाहीर केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

उद्धव ठाकरेंची दडपशाही

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावरील कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं होतं. “हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या दडपशाहीमुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने होत आहे, आमचं चॅलेंज त्यांना आहे. माझी पहिली हरकत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आहे. पहिली जबाबदारी गृहमंत्री वळसे पाटील यांची आहे.” “ठाकरे सरकार कितीवेळा दडपशाही करणार? हसन मुश्रीफांच्या घोटाळ्याविरोधात कागल पोलीस स्टेशनमध्ये जात होतो. सरसेनापती कारखाना त्या हद्दीत येतो. मी तक्रार केल्यानंतर ७ दिवसात कोर्टात जाऊ शकतो. मी अंबाबाईचं दर्शन घेणार हे तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. अंबाबाईचं दर्शन बाहेरुन करणार होतो.”, असंही सोमय्या म्हणाले. (we will expose bjp’s corruption, says nana patole)

 

संबंधित बातम्या:

VIDEO: मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही, राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया, सोमय्यांवरील कारवाईवर आघाडीत मतभेद?

‘तक्रारदार स्थानबद्ध, गावगुंड राज्यभर मुक्त’, आशिष शेलारांचा घणाघात

अजितदादा, तुम्ही चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा, रुपाली चाकणकरांची आग्रही मागणी

(we will expose bjp’s corruption, says nana patole)