मुंबई आणि कोकण किनारपट्टीला 5 दिवस ऑरेंज अॅलर्ट; ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार

| Updated on: Jul 19, 2021 | 3:48 AM

हवामान विभागाने मुंबई आणि कोकण किनारपट्टीला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट दिलाय. या भागात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे पाहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

मुंबई आणि कोकण किनारपट्टीला 5 दिवस ऑरेंज अॅलर्ट; ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us on

मुंबई : हवामान विभागाने मुंबई आणि कोकण किनारपट्टीला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट दिलाय. या भागात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे पाहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. याशिवाय 23 जुलै रोजी संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाचे जयंता सरकार म्हणाले, “मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच  दिवस ऑरेंज अलर्ट आहे. 50 ते 60 किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील.” यावेळी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी देखील माहिती दिली (Weather alert of Mumbai Kokan by IMD amid heavy rain).

आजारांचा फैलाव होवू नये म्हणून काळजी

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी म्‍हणाले, “मलेरिया, डेंगी आणि लेप्‍टो या आजारांचा फैलाव होवू नये म्‍हणून आवश्‍यक प्रतिबंधक उपाययोजना देखील सातत्‍याने सुरु आहेत. मलेरियाचे प्रमाण यंदाही पूर्णपणे नियंत्रणात असून आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात आहे.”

“धोकादायक इमारतीतील नागरिकांना कोणत्याही परिस्थिती बाहेर काढा”

उद्धव ठाकरे म्हणाले, “दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. आज चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर मलबा पसरून प्राणहानी झाली. ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी देखील मलबार हिल येथे टेकडीचा भाग अचानक खचला होता. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत. त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदार राहण्यास सांगावे. काही ठिकाणी भूमिगत वाहनतळामध्ये पाणी घुसले व वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच भांडूप येथे जल शुद्धीकरण केंद्रच बंद पडल्याची घटना घडली. हे पाहता अधिक सावधगिरी बाळगावी.”

“पावसाचा जोर रात्री वाढतो आहे हे 9 जून आणि आत्ता काल (17 जुलै) झालेल्या पावसाने लक्षात आले आहे. हे पाहता रात्री देखील पाणी उपसा करणारी यंत्रणा कर्मचारी काम करीत राहतील हे पाहावे. पाउस थांबल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती अधिक कमकुवत होऊन त्यांचा काही भाग पडून मोठी दुर्घटना घडते. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारती मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून स्थलांतरित करा,” असे आदेश उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.

फिव्हर क्लिनिक्स सुरु करा; आदित्य ठाकरेंचे आदेश

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असं सांगत महत्वाच्या सूचना केल्या. ते म्हणाले, “पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. कोविडचा धोका तर कायम आहे. यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरु करा. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी देखील नागरिकांना त्यांच्या तापाबाबत तपासणी व मार्गदर्शन हवे. गृहनिर्माण संस्थांमधून देखील याविषयी जनजागृती करा.”

“मुंबईत दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत. मात्र, अशा सर्वच ठिकाणांचा आयआयटी किंवा इतर तज्ज्ञ संस्थेमार्फत अभ्यास करून आणखी काही पर्याय आहेत का किंवा त्यांच्या मजबुतीकरणासंदर्भात पाऊले उचलता येतील का ते पाहावे. रेल्वे आणि बेस्ट यामध्ये अधिक चांगला समन्वय साधून अशा आपत्तीच्या वेळी प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून हॉटलाईन सुरु करावी,” असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

Maharashtra Rain Update: रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 100 मिमीहून अधिक पाऊस, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला रेड अ‌ॅलर्ट

Monsoon Update :चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD चा नेमका अंदाज काय?

Maharashtra Rain Update: कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ पाहा :

Weather alert of Mumbai Kokan by IMD amid heavy rain