प्रकाश आंबेडकर यांनी चार जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर… संजय राऊत यांच्या विधानाचा अर्थ काय?

| Updated on: Mar 21, 2024 | 10:33 AM

Sanjay Raut on Vanchit | वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील कुरबुरी सातत्याने बाहेर येत आहेत. इंडिया आघाडीच्या मंचावरुन प्रकाश आंबेडकर यांच्या कानपिचक्या सताधाऱ्यांनी चवीने ऐकविल्या. आता संजय राऊत यांनी पण हे संकेत दिले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी चार जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर... संजय राऊत यांच्या विधानाचा अर्थ काय?
Follow us on

मुंबई | 21 March 2024 : वंचित बहुजन आघाडीशी अगोदर उद्धव ठाकरे गटाने घरोबा केला. पण महाविकास आघाडीत वंचितला वाटा देण्यावरुन लवकर एकमत झाले नाही. दिलजमाई होत वंचितला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला. पण प्रकाश आंबेडकर यांचे ठेवणीतील बाण महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर सूटतच होते. त्यामुळे वंचित आणि महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे चित्र नसल्याचे स्पष्ट होत होते. मुंबईत इंडिया आघाडीच्या मंचावरुन आंबेडकर यांनी टीकास्त्र डागल्यानंतर चित्र स्पष्ट झाले. आता खासदार संजय राऊत यांनी या वादाचा सरळ सरळ अर्थच एकप्रकारे सांगून टाकला आहे. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीत समावेशाची शक्यता मावळली आहे.

राऊतांचे सूचक विधान

बाळासाहेब आंबेडकर हे सन्मानीय नेते आहेत. त्यांच्याशी अनेक वेळा आमची चर्चा झाली. त्यांनी चार जागेवरती लढावं, असा त्यांना प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता .या हुकूमशाहीच्या लढायला संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळाल असतं. आम्हाला अजूनही खात्री आहे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. तुमच्या मनात काही नाराजी असेल ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल. वंचित दलित समाज या लढ्यात असायलाच पाहिजे, असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

पश्चिम महाराष्ट्रातील एक जागा असावी

पश्चिम महाराष्ट्रात आम्ही कोल्हापूरची महत्त्वाची जागा महा विकास आघाडीच्या दिलेली आहे. राजू शेट्टी यांच्याशी देखील चर्चा सुरू आहे .त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात एखादी जागा असावी आणि ती ताकतीने लढावी अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने काही चुकीचा आहे मला वाटत नाही.

सांगलीसाठी आम्ही आग्रही

काँग्रेस पक्ष हा देशातला मोठा पक्ष आहे. महाराष्ट्र मध्ये शिवसेना आणि  राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत. सर्व पक्ष येऊन  एकत्र येऊन इंडिया आघाडी आहे. आम्ही त्या राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड झारखंड येथे जागा मागत नाही. प्रादेशिक पक्ष आपला राज्यातील सीट मागता आहे .त्याचे संघर्ष त्यावर अवलंबून आहे. भिवंडी बाबत आम्ही सगळे एकत्र आलो तर ती जागा आम्ही भाजप कडून  काढून घेऊ राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही भिवंडी जागे बाबत दावा करत आहेत. कोल्हापूरची जागा सीटिंग आहे, आम्ही ते हसत हसत सोडली. आम्हाला यातना झाल्या. त्यामुळे आमचे कार्यकर्ते म्हणत आहे आपण सांगली जागा लढवू. आम्ही नक्कीच त्या जागेवरती ठाम आहोत, असा दावा राऊतांनी केला. वसंतदादा पाटील यांच्या सांगलीतल्या स्मारकाकडे जाऊन त्यांना श्रद्धांजली आदरांजली आणि सांगली जिल्ह्यात मिरज येथे सभा असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान आमची भाषणं ऐकत आहेत

पंतप्रधान आमचे भाषण चांगल्या पद्धतीने ऐकत आहेत.आमची देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची डिक्शनरी आहे त्यांची स्वार्थ ची डिक्शनरी आहे. तुम्हाला या निवडणुकीत कळेल गरीब ईव्हीएमला शिव्या देत आहे. ईव्हीएम ला शिव्या देणे म्हणजे भाजपला शिव्या देण्यासारखे आहे.औरंगजेब सुद्धा हेच करत होता औरंगजेबाची खा खा वृत्ती होती. मोदींनी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं, ते काही काळा साठी पंतप्रधान असल्याचा दावा त्यांनी केला.