मुंबई : मुंबई महानगरपालिकेने 16 जूनपासून पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. लिटरमागे 25 पैसे ते 4 रुपयांपर्यंत ही वाढ प्रस्तावित आहे. महानगरपालिकेच्या या दरवाढीला भाजपने कडाडून विरोध केला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी एका बाजूला मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देऊन एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला पाणीपट्टी वाढवून दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे हे चालणार नाही अशी टीका केली. तसेच, ही पाणीपट्टी वाढ होण्यापासून रोखावी, असे आवाहन पालिका आयुक्तांना केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी उद्धव ठाकरे गटावरही निशाणा साधला.
पालिकेच्या जलविभागाने पाणी पट्टीवर दरवाढ केली. आधीच मुंबईकराना पुरेसे पाणी पोहोचत नाही. पाणी कसे पोहोचवू याचे नियोजन सत्ताधारी पक्षाने आणि उद्धव ठाकरे यांनी केले नाही. पण, दरवाढीचा नियम मात्र करून ठेवला. पाऊस आणखी लांबला तर काय होईल अशी भीती मुंबईकराना होती. परंतु, अप्पर वैतरणामध्ये सरकारचा जो पाण्याचा साठा असतो तो देण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईकरांचे काही पडले नाही. भाजपने अधिकृत फेरीवाल्याबाबत धोरण आणावे अशी मागणी केली. पण, महापालिकेने अधिकृत फेरीवाल्याबाबत अदयाप धोरण स्पष्ट केले नाही. मुंबईत 2 लाख फेरीवाले आहेत. ते स्थानिक आणि भूमिपुत्र आहेत. फेरीवाला धोरणाबाबत उच्च न्यायालयाची सुनावणी ऑनलाइन करता आली असती. पण, उद्धव ठाकरे यांनी ते केले नाही. भाजपने 1 लाख 10 हजार फेरीवाल्यांना एका बटणात मदत केली. ती स्किम यांनी बासनात बांधली, असा आरोप त्यांनी केला.
संजय राऊत तुम्ही अहमद पटेल यांना का भेटला होता? तेव्हा काय फुले वहायला गेला होतात का? राहुल गांधींच्या खांद्यावर हात टाकायला गेले होते. आदित्य ठाकरे सुद्धा दिल्लीत गांधी परिवाराला भेटले. तुम्ही खरे शिवसैनिक आहात का? हे आधी सांगा असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला. तसेच नाना पटोले दिल्लीची चाटूगिरी करत आहेत. नाना पटोले यांनी आजवर चाटूगिरीच केली आहे. त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी टीकाही त्यांनी केली.
आमच्यावर काही जण आरोप करत आहेत. पण, आरोप करणारे एसीमधून बाहेर पडणार आहेत की नाही? भाजप मुंबईकरांसाठी घोषणा पत्र तयार करत आहे. यातुन आम्ही मुंबईकरांसाठी अनेक नव्या योजना आणत आहोत. आमचे घोषणापत्र येईपर्यंत थांबा. त्या घोषणा पत्रात आणखी काय काय असेल ते बघाच असे शेलार यांनी सांगितले.