VIDEO: दंगल भडकावण्याची ताकद रझा अकादमीत कधीच नव्हती; संजय राऊतांचा निशाणा कुणावर?

| Updated on: Nov 14, 2021 | 1:39 PM

हिंसा भडकावण्याची ताकद रझा अकादमीमध्ये कधीच नव्हती. सरकारने त्यांच्यावर कधीच नियंत्रण आणलं आहे, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

VIDEO: दंगल भडकावण्याची ताकद रझा अकादमीत कधीच नव्हती; संजय राऊतांचा निशाणा कुणावर?
sanjay raut
Follow us on

मुंबई: हिंसा भडकावण्याची ताकद रझा अकादमीमध्ये कधीच नव्हती. सरकारने त्यांच्यावर कधीच नियंत्रण आणलं आहे, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील हिंसाचारामागे रझा अकादमी नव्हती तर या हिंसाचारामागे कोण आहे? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

राज्यात झालेल्या हिंसाचारात आपला हात नसल्याचं रझा अकादमीने काल स्पष्ट केलं होतं. तर संजय राऊत यांनी आज थेट रझा अकादमीलाच क्लिन चीट देणारं विधान केलं आहे.रझा अकादमी काय म्हणते मला माहीत नाही. पण महाराष्ट्रात हिंसाचार किंवा दंगली घडवण्या इतकी ताकद किंवा समर्थन रझा अकादमीकडे कधीच नव्हतं. काही वेळेला रझा अकादमीने लोकांची डोकी भडकवली आहे. पण त्यांच्यावर सरकारने पूर्ण नियंत्रण आणलं आहे, असं राऊत म्हणाले.

मोर्चे महाराष्ट्रातच का?

खरंतर त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद का उमटावे? त्रिपुरात असं काय घडलं की त्यामुळे महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटावी? बांगलादेशमध्ये मंदिरामध्ये हल्ले झाले म्हणून त्रिपुरात मोर्चे निघाले. त्यात मशिदींवर दगडफेक झाली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचं सांगतात. मग महाराष्ट्रातच का? उत्तर प्रदेशात का नाही? दिल्लीत का नाही? बिहारमध्ये का नाही? कर्नाटकात का नाही? फक्त महाराष्ट्रात का हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं काही तरी कारस्थान आहे असं वाटतं, असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा डाव

राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांचं अभिनंदन करतो. त्यांचं म्हणणं आहे की, त्रिपुरात काही घडलंच नाही. त्रिपुरात काही घडलंच नाही तरी मोर्चे निघत आहेत. त्रिपुरात काहीच घडलं नाही हे जर सत्य असेल तर मोर्चा आणि आंदोलनाचे आम्ही जे फोटो पाहतोय ते काय आहे? कशा करीता हा सर्व खेळ सुरू आहे? महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा आणि देशात तणाव निर्माण करण्याचा हा डाव आहे काय? असा सवाल राऊत यांनी केला.

मग हे कोण करत आहे?

त्रिपुरात मोर्चा काढतात. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. महाराष्ट्रात हिंसाचार होतो आणि रझा अकादमी म्हणते त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. मग हे कोण करत आहे? त्याचे उत्तर मिळायला हवं, असं सांगतानाच त्रिपुरात भाजपला तृणमूल काँग्रेसचं आव्हान उभं राहत आहे. त्यामुळे तर हे षडयंत्रं रचलं जात नाही ना? असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Milind Teltumbde | ज्याच्या डोक्यावर 1 कोटी 20 लाखाचं इनाम, तो देशातला सर्वात मोठा नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे ठार!

दरोड्याच्या तयारीत असलेल्या 6 जणांच्या टोळीला भोसरी पोलिसांनी इंगा दाखवला, तिथल्या तिथं नांग्या ठेचल्या!

PMAY-G: घर बांधण्यासाठीच्या कर्जावर सरकारकडून अनुदान; जाणून घ्या योजनेचा फायदा?