
आज लक्ष्मी पूजन.. दिवाळीतील महत्वाच्या दिवसांपैकी, साडेतीन मुहूर्तापैकी आजचा एक दिवस. सकाळी उठून छान कढत पाण्याने स्नान करून फटाके उडवण्याचा अनेकांचा मनसुबा. मात्र मुंबईतील थंडीचा अभाव आणि हवेची बिघडलेली गुणवत्ता यामुळे या दोन्हींवर पाणीच फिरण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळीतही मुंबईकर घामेघूम झाले असून वातावरणात थंडी, गारवा यांचे नामोनिशाण नाहीत. अजून काही दिवस तरी उष्म्याचेच असतील.
खरंतर दिवाळी आणि थंडी, असं एक समीकरण आहे. मात्र, यंदा मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत असल्याने दिवाळी थंडीविनाच साजरी होत आहे. तसंच ऐन दिवाळीत मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर देखील खालावला आहे. फटाक्यांवरील निर्बंध आणि न्यायालयीन बंधने यामुळे यंदा दिवाळीत वायुप्रदूषण कमी होईल, असा अंदाज होता. मात्र मुंबईकरांनी हा समज खोटा ठरवला आहे. दिवाळीपूर्वी काहीशी कमी झालेली शहरातील हवा प्रदूषणाची पातळी सोमवारी फटाक्यांमुळे वाढली.
थंडी गायब उकाडा कायम
दिवाळी आणि हवीहवीशी वाटणारी थंडी असं एक समीकरण असतं. पण वर्षातला बहुतांश काळ दमट, घामट हवामानाचा सामान करणाऱ्या मुंबईतरांना यंदाही दिवाळीत उष्म्याचाच त्रास होत आहे. यंदा मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत असल्याने दिवाळी थंडीविनाच साजरी करावी लागत आहे. सोमवारी कमाल तापमान 35.9 तर किमान तापमान 25.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. खरंतर थंडीसाठी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसखाली, तर किमान 20 पेक्षा खाली असणे अपेक्षित असते. पण थंडीची चाहूलही मुंबईत लागलेली नाही.
दरम्यान, या महिन्यात तरी तापमानाचा पारा एवढ्या खाली घसरण्याची शक्यता कमी आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली असून, आर्द्रतेच्या कमी-अधिक फरकामुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत. गेल्या आठवड्यातील शुक्रवारी नोंदविलेले 37 अंश सेल्सिअस हे कमाल तापमान चालू मोसमातील सर्वाधिक कमाल तापमान होते.
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ‘ऑक्टोबर हीट’ची झळ बसत आहे. सकाळी धुकं, वाहनांचा धूर, बांधकामातील धूळ, दुपारी वाढते तापमान आणि रात्रीची दमट हवा या सगळ्यांचा परिणाम आता नागरिकांच्या फुप्फुसांवर होऊ शकतो.
हवेची गुणवत्ता खालावली
ऐन दिवाळीत मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर देखील खालावला आहे . दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेचा दर्जा खालावला आहे. फटाक्यांवरील निर्बंध आणि न्यायालयीन बंधने यामुळे यंदा दिवाळीत वायुप्रदूषण कमी होईल, असा अंदाज होता. मात्र मुंबईकरांनी हा समज खोटा ठरवला आहे. दिवाळीपूर्वी काहीशी कमी झालेली शहरातील हवा प्रदूषणाची पातळी सोमवारी फटाक्यांमुळे वाढली. शहरातील भायखळा, माझगाव, नेव्ही नगर, कुलाबा, वरळी येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तसेच इतर भागांतही हवेचा दर्जा वाईट श्रेणीत नोंदला गेला. तर वांद्रे कुर्ला संकुल येथे सलग दुसऱ्या दिवशी ३३६ हवा निर्देशांक होता. म्हणजेच येथील हवा ही ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली.
काही ॲपच्या नोंदीनुसार सोमवारी मुंबईच्या हवेचा दर्जा मध्यम श्रेणीत नोंदला गेला. उच्च न्यायालयाने फटाके वाजविण्याच्या वेळेवर निर्बंध घातल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र यंदा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी मुंबईकरांनी बंधने झुगारून फटाके उडविले. शहरात सोमवारी दुपारपर्यंत सर्व भागांतील हवा ‘मध्यम’ श्रेणीत होती. त्यानंतर संध्याकाळी 6 नंतर अनेक भागांतील हवा ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ स्तरावर होती.
पहिल्याच दिवशी प्रदूषणाची टक्केवारी वाढली
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेचा दर्जा खालावला असून दिवाळीपूर्वी काहीशी कमी झालेली शहरातील हवा प्रदूषणाची पातळी सोमवारी फटाक्यांमुळे वाढली. शहरातील भायखळा, माझगाव, नेव्ही नगर, कुलाबा, वरळी येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तसेच इतर भागांतही हवेचा दर्जा वाईट श्रेणीत नोंदला गेला. तर वांद्रे कुर्ला संकुल येथे सलग दुसऱ्या दिवशी ३३६ हवा निर्देशांक होता. म्हणजेच येथील हवा ही ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली. त्यामुळे आज सकाळी संपूर्ण मुंबईवर प्रदूषणाची चादर पसरल्याचे पाहायला मिळाले.
भायखळा येथील हवा निर्देशांक सोमवारी सायंकाळी 7 च्या सुमारास 211 इतका म्हणजेच ‘वाईट’ श्रेणीत नोंदला गेला. तसेच देवनार येथे 267, माझगाव 255, वरळी 213, विलेपार्ले 215, नेव्ही नगर कुलाबा 279, मालाड 215, खेरवाडी वांद्रे 203, चकाला 254 आणि बोरिवली येथे 228 इतका हवा गुणवत्ता निर्देशांक होता. या सर्व भागातील हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली आहे. त्याखालोखाल चेंबूर येथील हवा निर्देशांक 152, कुलाबा 106, घाटकोपर 186, कांदिवली 155, भांडूप 12, कुर्ला 118, शिवडी 131 आणि शिवाजी नगर येथे हवा गुणवत्ता निर्देशांक 141 इतका होता. म्हणजेच येथील हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली. संपूर्ण मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी 185 इतका म्हणजेच ‘मध्यम’ श्रेणीत होता.
तज्ज्ञांच्या मते, रात्री 10 ते पहाटे 1 आणि सायंकाळच्या सुमारास हवा सर्वाधिक दूषित होते. “हिवाळ्यात वाऱ्याचा वेग कमी आणि हवा स्थिर असल्याने प्रदूषण हवेत जास्त काळ टिकते. त्यामुळे मध्यरात्री किंवा पहाटे AQI सर्वाधिक खराब नोंदवला जातो.
जागतिक क्रमवारीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय, IQAir च्या माहितीनुसार, या आठवड्याच्या शेवटी मुंबई जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबईचा AQI 171 तर दिल्ली 184 AQI सह पहिल्या क्रमांकावर, आणि कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
सण-उत्सव आणि फटाके फोडताना सुरक्षात्मक मास्क वापरा. शक्य असल्यास एअर प्युरिफायर असलेल्या खोलीत राहा. शहरातील वाहनधूर आणि बांधकामातील धूळ यांचा संपर्क टाळा, असं आवाहन मुंबईकरांना मनपाकडून करण्यात आलं आहे.