अखेर ठाकरेंच्या खासदाराने ऑपरेशन टायगरबद्दल सगळं सांगितलं; शिंदेंना भेटताच…सगळा सस्पेन्स संपला!
हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. याबाबत त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.

Nagesh Patil Ashtikar : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरचा उल्लेख वारंवार केला जात आहे. या मोहिमेअंतर्गत ठाकरेंचे काही खासदार शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, असा दावा केला जात आहे. एकीकडे हा दावा केला जात असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. यात हिंगोलीचे खासदार भाऊसाहेब आष्टीकर यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी संजय दीना पाटील यांनीही शिंदे यांच्यासोबत एकाच कारने प्रवास केला होता. दरम्यान, आता नागेश पाटील आष्टीकर यांनी माध्यमांशी थेट संवाद साधून ऑपरेशन टायगरबाबत सविस्तर भाष्य केलं. तसेच त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेवरही भाष्य केलं.
कामानिमित्त भेटी घ्याव्याच लागतात
आमच्या कोणत्याही खासदाराच्या मनात पक्षांतर करण्याचा विचार नाहीये. कामानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधानांकडे जावेच लागते. त्याच हिशोबाने आम्ही जातो. बाकी काहीही नाही. परंतु पक्षांतराबाबत उगीचच गैरसमज निर्माण केला जात आहे, असे नागेश पाटील आष्टीकर म्हणाले. तसच मी एकट्याने भेट घेतली की खासदारांचे पक्षांतर होणार आहे का? असा सवालही त्यांनी केला.
मला उद्धव ठाकरे काहीही म्हणालेले नाहीत
मी सह्याद्री अतिथीग्रहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. रोजच्या रोज दैनंदिन जीवनात लोकांच्या अडचणी असतात, त्यासाठी भेटी घ्याव्या लागतात. मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा आमचे नेते उद्धव ठाकरे हे कधीच काहीही बोलले नाहीत, असेही स्पष्टीकरण नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले.
कुठेही पक्षांतर करणार नाही
आमचे सात खासदार भेटले किंवा नऊ खासदार भेटले याचा अर्थ पक्षांतर होणार असा नाही. ऑपरेशन टायगरबद्दल बोलले जात आहे. जे लोक ऑपरेशन टायगरबद्दल बोलत आहेत, त्यांनाच विचारा की हे ऑपरेशन नेमके कधी होणार? मी कुठेही जाणार नाही. कुठेही जाण्याचा विषयच नाही, असे नागेश पाटील आष्टीकर यांनी स्पष्ट केले. तसेच पण जर कुठेही पक्षांतर करायचे असेल तर आम्ही ते आवर्जुन माध्यमांना सांगू, असे म्हणत भविष्यात आम्ही कुठेही जाणार नाही असे सांगितले.