मंदिरात आरती सुरू असतानाच 100 वर्ष जुनं झाड कोसळलं, 7 जणांचा मृत्यू, 35 जण जखमी; अकोल्यात हाहाकार

| Updated on: Apr 10, 2023 | 6:36 AM

अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असताना 100 वर्ष झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत साजजण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मंदिरात आरती सुरू असतानाच 100 वर्ष जुनं झाड कोसळलं, 7 जणांचा मृत्यू, 35 जण जखमी; अकोल्यात हाहाकार
Akola
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अकोला : अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाबूजी महाराज मंदिरावरील टिन शेडवर झाड पडल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 30 ते 35 जण जखमी झाले असून त्यांनना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मंदिरामध्ये आरती सुरू असताना सोसाटाच्या वाऱ्यामुळे 100 वर्ष जुनं झाड अचानक कोसळलं. त्यात सात जणांना जीवाला मुकावं लागलं. या घटनेमुळे अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.

बाबूजी महाराज मंदिरात काल रात्री आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. दररोज होणाऱ्या या आरतीला ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आरती सुरू असतानाच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मंदिराबाहेर आरतीसाठी उभे असलेले भाविक मंदिरात आले. सर्वजण मंदिरात दाटीवाटीने उभे राहून आरती करत होते. बाहेर पाऊस सुरू होता. इतक्यात मंदिरालाच लागून असलेलं 100 वर्ष जुनं लिंबाचं झाड मंदिराच्या टिन शेडवर कोसळलं. अचानक झाड कोसळल्याने संपूर्ण शेड खाली आली आणि त्यात अनेकजण दबले गेले. त्यामुळे लोकांमध्ये एकच घबराट पसरली. तात्काळ झाड हटवून लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली. या टिनच्या शेडखालून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

हे सुद्धा वाचा

जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवला

तसेच शेडखालून 30 ते 35 जखमींना बाहेर काढण्यात आले. या सर्वांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी काहींना किरकोळ मार लागलेला होता. त्यांच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले. तर 29 जणांना प्रचंड मार लागला असून त्यांच्यावर अकोल्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाचं एक बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं. पावसामुळे झालेला चिखल, वादळी वारा आणि रात्रीचा अंधार यामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. घटनास्थळी रुग्णवाहिकाही मागवण्यात आल्या होत्या. त्यातून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत होतं.

रात्रभर शोध सुरू

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंदिर परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. गावातील नागरिक आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होते. रात्रभर आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. काही लोक रुग्णालयात जाऊन आपले नातेवाईक तर भरती झाले नाहीत ना याची खातरजमा करून घेत होते. काही लोक फोन करून रिंग वाजतेय का हे बघत होते. रात्रभर मंदिर परिसरात आक्रोश आणि रडारड सुरू होती.