कोकणाला झोडपलं, आता विदर्भाचा नंबर, IMD कडून विदर्भाला ऑरेंज अ‌ॅलर्ट, चंद्रपूर गडचिरोलीत अतिवृष्टी तर नागपूरला मुसळधार

| Updated on: Jul 22, 2021 | 1:21 PM

विदर्भात मुसळाधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे. IMD कडून विदर्भात दोन दिवस ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

कोकणाला झोडपलं, आता विदर्भाचा नंबर, IMD कडून विदर्भाला ऑरेंज अ‌ॅलर्ट, चंद्रपूर गडचिरोलीत अतिवृष्टी तर नागपूरला मुसळधार
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us on

नागपूर: विदर्भात मुसळाधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे. IMD कडून विदर्भात दोन दिवस ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ‘चंद्रपूर, गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर, नागपरूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर विभागाचे संचालक मोहनलाल शाह यांनी ही माहिती दिलीय.

विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा

एकीकडे मुंबई आणि कोकणात मुसळाधार पाऊस पडतोय, तर दुसरीकडे विदर्भातंही मुसळाधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात ॲारेंज अलर्ट जारी केलाय. विदर्भातील गडचीरोली आणि चंद्रपुर या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात पुढील दोन दिवस मुसळाधार पावसाची शक्यता आहे, असं याबाबत नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

चंद्रपूरमध्ये मुसळधार

चंद्रपूर जिल्ह्यात कालपासून पावसाची रिपरिप सुरु होती. साडेबाराच्या सुमाराास पावसाने पुन्हा वेग पकडला आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत धान पिकाला गरज अशाच मोठ्या पावसाची गरज होती. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे 42 टक्के एवढा पाऊस पडलाय. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडून 500 क्युमेक्स एवढा जल विसर्ग नदी प्रवाहात सोडला जाणार आहे. पुढच्या काही तासात वैनगंगा नदीकाठच्या गावांना व शेतीला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील लाल नाला सिंचन प्रकल्प 75 टक्के भरला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तुटला

अमरावती जिल्ह्यात मागील 48 तासापासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या या जोडीने शेतातील काम सुद्धा थांबले आहेत.दऱ्याखोऱ्यानी समृद्ध असलेल्या मेळघाटातील लहान मोठ्या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. मेळघाटातील अनेक पूल हे ब्रिटिश कालीन असून कमी उंचीचे असल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे जिल्हा मुख्यालयापासून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ज्या पुलावरून दोन चाकी किंवा चारचाकीने पूल ओलांडणे शक्य नाही अशा ठिकाणी नागरिक शेतात व इतर कामा करिता जाण्यासाठी थेट ट्रॅक्टर व ट्रॉलीचा वापर करत आहेत अशा प्रकारे होणारी वाहतूक ही धोकादायक असून पाऊस असताना पूल ओलांडून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

वाशिम जिल्ह्यात काटेपूर्णा नदीला पूर

मागील दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू असून काटेपूर्णा नदीला पूर आल्याने कुत्तर डोह या गावाचा संपर्क दोन दिवसापासून तुटलेला आहे. अमनवाडी ते कुत्तर डोह गावाजवळ असलेल्या रस्त्यात वर असलेल्या कमी उंचीच्या पुलावर पाणी वाहत असल्याने गेल्या दोन दिवसापासून कुत्तर डोह येथील काही शेतकरी मजूर अमानवाडी शिवारात अडकून पडलेले आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून या पुलाच्या उंची संदर्भात कोणत्या ही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले नाहीत मागील वर्षी पूर आल्याने कोथळी येथील दोन युवक मोटारसायकल सहज वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यावेळी रिसोड विधानसभेचे आमदार अमित झनक यांनी या पुलाची उंची वाढविण्यास संदर्भात प्रयत्न केल्या जाईल, असे आश्वासन दिले होते परंतु एक वर्ष होऊनही कोणताच पाठपुरावा झाला नसल्याचं दिसून येत आहे.

अकोल्यात ढगपफुटीसदृश्य पाऊस

अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. व्याळा ते रिधोरा दरम्यान ढगफुटी सदृश स्थीती निर्माण झाली असून व्याळा गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. रिधोरा परीसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असून रिधोऱ्यातही अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकीला खोळंबा निर्माण झाला आहे.. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांग लागल्या आहेत.

इतर बातम्या:

Vasai-Virar Rain | वसईत सनसिटी गास रस्ता 4 दिवसांपासून पाण्याखाली, 10 ते 12 गाव पुराच्या विळख्यात

Chiplun Flood: चिपळूणमध्ये महाप्रलय, 2005 पेक्षाही भयंकर पूर, खासदार विनायक राऊत दिल्लीवरुन कोकणाकडे