ओबीसींचा मुद्दा प्रचारातून गायब, स्थानिक मुद्द्यांवर राजकारण्यांचा जोर, मतदार नाराजीचा पुरेपूर विचार!

| Updated on: Oct 01, 2021 | 10:18 AM

ओबीसी मुद्द्यावरुन सर्वपक्षीयांनी रान उठवलं. भाजपने तर अगदी निवडणूक न घेण्याची, बहिष्कार टाकण्याची भाषा वापरली. पण स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्याऐवजी स्थानिक मुद्दे, गट, तट आणि नेत्यांचा प्रभाव हेच प्रमुख घटक ठरत असल्याचं दिसून येतंय

ओबीसींचा मुद्दा प्रचारातून गायब, स्थानिक मुद्द्यांवर राजकारण्यांचा जोर, मतदार नाराजीचा पुरेपूर विचार!
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदच्या रिक्त 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी प्रचार शिगेला पोहचलाय. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजप आक्रमक होती, सर्वच पक्षांनी ओबीसींचा मुद्दा लावून धरला होता. पण आता प्रत्यक्ष प्रचारात ओबीसींचा मुद्दा प्रचारात दिसून येत नसल्याचं निदर्शनास येत आहे.

स्थानिक मुद्द्यांवर राजकारण्यांचा जोर

ओबीसी मुद्द्यावरुन सर्वपक्षीयांनी रान उठवलं. भाजपने तर अगदी निवडणूक न घेण्याची, बहिष्कार टाकण्याची भाषा वापरली. पण स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत आरक्षणाच्या मुद्याऐवजी स्थानिक मुद्दे, गट, तट आणि नेत्यांचा प्रभाव हेच प्रमुख घटक ठरत असल्याचं दिसून येतंय.

प्रचारात नेत्यांच्या भाषणात नेहमी मोठमोठे मुद्दे, प्रस्तावित कामांचा पाढा, झालेल्या कामाची उजळणी, असे मुद्दे दिसतात. तर कधी राज्य पातळीवरचे बडे मुद्दे.. पण नागपूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी स्थानिक मुद्दे नेत्यांच्या भाषणात दिसून येत आहेत.

मतदार नाराजीचा पुरेपूर विचार!

त्यांचं कारणंही विशेष आहे, ते म्हणजे पंचायत समिती गणात आणि जिल्हा परिषद गटात मदार हे फक्त ओबीसी नसून सगळ्या प्रवर्गाचे आहेत. केवळ ओबीसींवर बोलून बाकीचे मतदार नाराज करणं, हे कोणत्याच पक्षाला परवडणारं नाही. त्याचमुळे ओबीसींचा मुद्दा मागे टाकून स्थानिक विषयांवर बोलणं नेते पसंत करतायत. म्हणजेच आपले मतदार आपल्यावर नाराज होणार नाहीत, याची पुरेपूर काळजी नेतेमंडळी घेताना दिसून येत आहेत.

नागपूर जिल्ह्यात कुठल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोटनिवडणूक होणार?

तालुका – जिल्हा परिषद सर्कल

नरखेड – सावरगाव, भिष्णूर
काटोल – येनवा, पारडसिंगा
सावनेर – वाकोडी, केळवद
पारशिवनी – करंभाड
रामटेक – बोथिया
मौदा – अरोली
कामठी – गुमथळा, वडोदा
नागपूर – गोधनी रेल्वे
हिंगणा – निलडोह,
डिगडोह – इसासनी
कुही – राजोला

तिरंगी लढत

नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांवर शिवसेना पोटनिवडणूक लढवणार आहे. जिल्हा परिषदेच्या 12 सर्कलमध्ये शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत. आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर न दिल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. तर काँग्रेस-

राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळेल.

महाविकासआघाडीची प्रतिष्ठा पणाला

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर ही निवडणूक होत आहे, त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला चांगलाच कस लागणार आहे. डिसेंबर 2019 च्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवरुन निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समित्यांच्या 31 सदस्यांचं सदस्यत्व निवडणूक आयोगाने रद्द केलं होतं. ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने आता खुल्या प्रवर्गातून निवडून येण्यासाठी ओबीसी उमेदवारांना चांगलाच कस लागणार आहे.

“म्हणून शिवसेना स्वबळावर लढणार” 

शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी जून महिन्यातच दिली होती. “कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून सेना स्वबळावर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे” असं आशिष जैसवाल यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असं चित्र पाहायला मिळणार आहे.

(nagpur zp election by poll campaigning Politicians do not speak on OBC reservation)

हे ही वाचा :

नागपूर ZP पोटनिवडणूक | शिवसेनेचा काँग्रेस विरोधात प्रचार, तर भाजपची मदार बावनकुळेंवर