‘ते’ भक्त असले तरी, भक्त आणि अंधभक्त यामध्ये फरक; उद्धव ठाकरेंचा टोला कोणाला,मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन
बाबासाहेबांनी केवळ घटनाच लिहिली असे नाही तर पुढे निर्माण होणाऱ्या अडचणी, अडथळेही त्यांनी आपल्याला दाखवून दिले आहेत. केवळ दाखवलेच नाही तर त्यावर त्यांनी उपाय ही सुचवले आहेत पण हे कोण लक्षात घेणार असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
मुंबईः ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे बाबासाहेबांचे भक्त आहेत, ते भक्त असले तरी, भक्त आणि अंधभक्त यामध्ये फरक असतो. अंध भक्त फक्त उदोउदो करत सुटतो, तर भक्त हा आपल्या दैवताच्या विचारांवर आयुष्याभराची वाटचाल करतो, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी लगावला. नितीन राऊत यांच्या पुस्तकाप्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी–कॉन्टेपररी रिलिवन्स’ या पुस्तकाचे ऑनलाईन(दुरदृष्यप्राणालीद्वारे) प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जून खरगे, इंडियाना युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. केव्हीन ब्राऊन, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात, (Sukhdev Thorat) पुस्तकाचे लेखक ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी नागपूरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
‘आंबेडकर ऑन पाप्युलेशन-कंटेंपररी रिलिव्हन्स’ या माझ्या पुस्तकाचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच मा. मल्लिकार्जुन खरगे, मा. के. राजू, मा.सेल्वम, मा. केव्हिन ब्राऊन,प्रा.सुखदेव थोरात,प्रा.प्रदीप आगलावे यांच्या उपस्थितीत आज प्रकाशन पार पडले. pic.twitter.com/wlFwWVTjoI
— Dr. Nitin Raut ?? (@NitinRaut_INC) April 17, 2022
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की पुस्तक प्रकाशनासाठी डॉ. नितीन राऊत यांना प्रथम शुभेच्छा देतो. अनेक प्रकाशनाच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलो असलो तरी आजचा हा प्रकाशन कार्यक्रम आगळावेगळा असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारणी माणूस हा अभ्यासू
या पुस्तकप्रकाशनच्या निमित्ताने एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, राजकारणी माणूस हा अभ्यासू असतो. कारण या महामानवाच्या विचारांवर लिहिलेले हे पुस्तक नक्कीच अभ्यासू असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नितीन राऊत हे जसे अभ्यासू मंत्री आहेत, तसेच ते एक जीवाला जीव देणारे सहकारीसुद्धा आहेत असंही मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचं दैवत आहेत, अशी दैवतं किती वर्षांनी, कुठे जन्माला येतात हे सांगता येत नाही. जन्माला आल्यानंतर आयुष्याची वाटचाल करत असताना अनेक वाटा, पर्याय आपल्यासमोर असतात. त्यातल्या काही वाटा चोखाळायला धाडस लागतं, हे धाडस बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात केलं आहे म्हणून ते फक्त देशाचे नाही तर जगाचे दैवत ठरले आहेत.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु
आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु आहे, ज्यांनी देशाची राज्यघटना लिहिली, आपल्याला दिशा दाखवली त्याचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. ज्ञानवंत-प्रज्ञावंत असलेल्या आपल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे विचार आजही आपल्याला दिशा दाखवतात आणि तेच महत्वाचे आहे.
आंबडेकरांनी अडचणींवर उपाय सुचवले
बाबासाहेबांनी केवळ घटनाच लिहिली असे नाही तर पुढे निर्माण होणाऱ्या अडचणी, अडथळेही त्यांनी आपल्याला दाखवून दिले आहेत. केवळ दाखवलेच नाही तर त्यावर त्यांनी उपाय ही सुचवले आहेत पण हे कोण लक्षात घेणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
विचारांची, धोरणांची माहिती
यावेळी त्यांनी सांगितले की, या पुस्तकात डॉ. बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या लोकसंख्येसंदर्भातील विचारांची, धोरणाची माहिती आहे असे सांगून त्यांनी त्यांना अभिवादन केले. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पचक्र वाहून, नमस्कार करून बाबासाहेब आपल्याला कळतात का, बर कळले तर आपण त्यांनी जे विचार सांगितले ते समजून घेऊन वागतो आहोत काय़ ? याचा विचार प्रत्येकांनी करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
संबंधित बातम्या
Kanhaiya Kumar : बिहार काँग्रेसची कमान कन्हैया कुमार यांच्याकडे? अध्यक्षपदाच्या रेसमध्ये कोण कोण?