Nagpur Heat Wave | नागपुरात उष्माघाताने रिक्षाचालकाचा मृत्यू, पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट कायम

| Updated on: May 11, 2022 | 12:17 PM

मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. आठ वाजता मृतावस्थेत सापडल्याचे सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक अमोल कोचे यांनी सांगितलं. मृतकाला मेयो रुग्णालायत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलंय.

Nagpur Heat Wave | नागपुरात उष्माघाताने रिक्षाचालकाचा मृत्यू, पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट कायम
नागपुरात उष्माघाताने रिक्षाचालकाचा मृत्यू
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : हवामान विभागानं (Meteorological Department) पश्चिम विदर्भात (West Vidarbha) गुरुवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. त्यामुळे अकोला, वाशिम, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यात उष्ण हवेमुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. नागपूरमध्ये वाढत्या उकाड्यामुळे सध्या जीवाची लाहीलाही होतेय. अशातच नागपूरच्या सीताबर्डी पोलीस (Sitabardi Police) स्टेशनच्या हद्दीमध्ये आनंद टॉकीजजवळ एका रिक्षाचालकाचा रिक्षामध्ये मृतदेह आढळला. प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली असता उष्माघातामुळे रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर नागपूरमध्ये उष्माघाताने मृत्यू होण्याचा आकडा हा दहावर पोहोचलेला आहे. पुढची काही दिवस नागपूरसह विदर्भात उन्हाचा कडाका असाच कायम राहणार असल्याचे नागपूर वेधशाळेने स्पष्ट केले.

मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न

रिक्षामध्ये मृतदेह सापडला. सुकेश यांनी नऊ वाजता कळविले. आनंद टॉकीजजवळ पिलरखाली व्यक्ती मृतावस्थेत सापडला. मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहोत. मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. आठ वाजता मृतावस्थेत सापडल्याचे सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक अमोल कोचे यांनी सांगितलं. मृतकाला मेयो रुग्णालायत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलंय.

कसं राहणार तापमान?

नागपुरात काल 43.2 अंश डिग्री तापमान होतं. आज सकाळपासून आकाश ढगाळलेलं आहे. पण, तापमानाचा पारा काही कमी झालेला नाही. पुढील काही जवळपास असंचं तापमान राहणार आहे. 14 ते 17 मेपर्यंत 44 अंश डिग्री तापमान होण्याची शक्यता आहे. अकोल्यात काल 45 अंश डिग्री सेल्सिअस तापमान होतं. येत्या आठवडाभर जवळपास असंच तापमान राहणार असल्याचा हवामानं खात्यानं अदाज वर्तविलाय. चंद्रपूरमध्ये कालचं तापमान 44.2 अंश डिग्री सेल्सिअस होतं. येत्या आठवडाभर जवळपास असंच तापमान राहणाराय.

हे सुद्धा वाचा

चंद्रपुरात चौकांतील वाहतूक दिवे बंद

तापत्या उन्हाळ्यात चंद्रपूर पोलीस प्रशासनाने नागरिकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलाय. सूर्याचा प्रकोप पाहता दुपारच्या वेळेस विविध चौकातील वाहतूक दिवे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. संपूर्ण शरीर झाकूनही शहरातील विविध रस्त्यावरून फिरताना वाहतूक सिग्नलवरचा थांबा शहरवासीयांना चांगलाच तापदायक होता. शहर-जिल्ह्याच्या तापमानाने 47 डिग्रीचा उंबरठा गाठला असताना रणरणत्या उन्हात सिग्नल हिरवा होण्याची प्रतीक्षा शिक्षा ठरत होती. आता यावर उपाय म्हणून दुपारी दीड ते 4 या काळात वाहतूक सिग्नल्स बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतलाय. गेल्या काही दिवसात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील उष्माघात रुग्णांची संख्या 100 पार झाली आहे हे विशेष. मात्र आता वाहतूक दिवे बंद असताना स्वतःहून नियम पाळण्याची जबाबदारी वाहनधारकांवर आली आहे. विविध वर्दळीच्या चौकात वाहनधारकांनी खबरदारी घेत वाहने दामटण्याची गरज आहे.