…तर मी महाराष्ट्र सोडून मध्यप्रदेशात जाणार, के. चंद्रशेखर राव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

आम्ही आमची सुरुवात महाराष्ट्रापासून केलीय. १० दिवसांनंतर आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान असं करत पुढे जाणार आहोत. देशात सर्व स्तरातील लोक नाराज आहे.

...तर मी महाराष्ट्र सोडून मध्यप्रदेशात जाणार, के. चंद्रशेखर राव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Govinda Hatwar | Updated on: Jun 15, 2023 | 8:39 PM

गजानन उमाटे, प्रतिनिधी, नागपूर : भारत राष्ट्र समितीचा देशपातळीवर विस्तार होत आहे. महाराष्ट्र राज्यभरात सर्व शक्तिनिशी कार्य सुरू आहे. विदर्भात सर्वदूर पक्ष विस्तार करण्यासाठी नागपूर येथे भारत राष्ट्र समिती पक्ष, विदर्भ (BRS) च्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते आज झाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना के. चंद्रशेखर राव म्हणाले, BRS पक्षाच्या स्थापनेचा उद्देश हा देशात उच्च दर्जाच्या बदलाचा आहे.

आम्ही आमची सुरुवात महाराष्ट्रापासून केलीय. १० दिवसांनंतर आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान असं करत पुढे जाणार आहोत. देशात सर्व स्तरातील लोक नाराज आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडलीय. गरज नसलेल्या वस्तूंची आयात वाढलीय. आपला देश कृषी प्रधान आहे. तरीही १ लाख कोटीचे पाम तेल आयात करतोय. हे तात्काळ थांबायला हवं. देशात चांगल्या दर्जाच्या परिवर्तनाची गरज आहे.

८० टक्के पावसाचे पाणी वाहून जाते

चीनमधून बऱ्याच गोष्टी आयात करतोय. आपण बनवू शकतो त्या गोष्टी ही आपण आयात करतोय. पाणी आणि वीज महत्त्वाचे विषय आहेत. गरजेपेक्षा जास्त पाणी आपल्याकडे आहे. गेल्या ७५ वर्षांत धोरणं न बदलल्याने ८० टक्के पावसाचं पाणी समुद्रात वाहून जातेय. पाणी प्रश्नावर राज्यांना आप आपसात का लढवलं जातंय? अन्न प्रक्रिया उद्योग वाढवून निर्यात वाढायला हवी. दमदार सरकार असलं तर देशात अशी शेती आहे, की प्रत्येक एकरात पाणी दिलं जाणं शक्य आहे, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांत देशाची राजधानी दिल्लीत पाण्याची समस्या आहे. प्रत्येक गोष्टीत आपण खाली चाललोय. आम्ही अनेक आघाड्या बघीतल्या. पण त्या पर्याप्त नाही. त्यामुळे आम्ही आमचा अजेंडा पुढे नेतोय. हा अजेंडा मान्य असणारे पक्ष आमच्यासोबत येऊ शकतात.
आमचा पक्ष आता प्रादेशिक पक्ष नाही तर राष्ट्रीय पक्ष आहे.

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात

देशात एक फॅशन झालीय. कुणाची बी टीम ए टीम. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून सुरुवात केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात मी महाराष्ट्र सोडून मध्यप्रदेशात जाणार, असे आव्हान फडणवीस यांना दिले. तसेच स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आम्ही सोडला नाही. विदर्भ राज्य बनवण्याबाबत केंद्र सरकारने विचार करायला हवा, असंही के. चंद्रशेखर राव म्हणाले.

Follow Us