Cold | विदर्भ गारठले : थंडी, पावसाचा विचित्र संगम; पिकांवर काय होणार परिणाम?

विदर्भात एकीकडं थंडी पडत आहे. तर, दुसरीकडं पाऊस पडत आहे. त्यामुळं रेनकोट घालावा की, स्वेटर घालावी, अशी विचित्र परिस्थिती घराबाहेर पडणाऱ्यांची झाली आहे.

Cold | विदर्भ गारठले : थंडी, पावसाचा विचित्र संगम; पिकांवर काय होणार परिणाम?
अमरावती जिल्ह्यात गारपिटीने पिकांचे नुकसान केले आहे.
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 11, 2022 | 11:37 AM

नागपूर : नागपूरच्या काही भागात रिमझिम पावसाला सुरवात झाली. त्यामुळं नागपूरकरांची तारांबळ उडत आहे. कालपासून नागपूरसह विदर्भात ढगाळ वातावरण आहे. अगदी पावसाळ्या सारख वातावरण झालं. तापमानातही घट झाली. हिवाळ्यात पावसाळ्याचा आनंद घ्यावा लागत आहे. पावसामुळं वातावरणात गारठा वाढला.

गारठ्यावर शेकोटीचा उतारा

नागपूरसह संपूर्ण विदर्भात कालपासून ढगाळ वातावरण आहे. थंड हवा वाहत असल्याने वातावरणात गारठा निर्माण झालाय. सकाळी काही जण शेकोटीचा आनंद घेत होते. पण, पाऊस आल्यानं रस्त्याच्या शेजारील शेकोट्या विझल्या. गुलाबी थंडीत मॉर्निंग वॉकला निघणारे थोडे उशिराच घराबाहेर पडले. काहींनी तर दुलई पांघरून बेडवरच राहणे पसंत केले.

संत्रा, कापूस, तूर, हरभऱ्याचे नुकसान

हवामान खात्याने विदर्भात पुढील तीन दिवस गारपिटीसह पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळं काल रात्रभर अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीसह पाऊस झाला. या पावसामुळं मोर्शी व चांदुरबाजार तालुक्यातील संत्रा, कापूस, तूर, हरभरा सह इतर पिकांचे नुकसान झाले. तर, नेरपिंगळाई येथील जिल्हा परिषद शाळेचे टिनपत्रे उडाली. इतर घरांचे देखील टीनपत्रे वादळाने उडाली. त्यामुळ तातडीने शासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली.

अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस

हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. यानुसार सोमवारी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात आलाय. शेतकऱ्यांच्या तूर, कपाशी, पिकासह पालेभाज्यांचा देखील नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या तुरी पावसात भिजून गेल्यात. पुढील दोन दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे.

पावसाने नागरिकांची तारांबळ

चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सूर्यदर्शन झाले नसल्याने गारठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. सकाळच्या सुमारास कोसळत असलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. चंद्रपूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शेत शिवारात कापून ठेवलेली धान्ये सुरक्षित ठिकाणी नेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शिवारात असलेल्या तूर-गहू-चना या पिकांना पावसाचा फटका बसत आहे.

भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका

वेधशाळेचा वर्तविलेला अंदाज पुन्हा खरा ठरला. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. भंडारा, लाखनी, साकोली, पवनी परिसरात बरसलेल्या पावसाने रबी पिकासह भाजीपाला पिके संकटात सापडली. विशेष म्हणजे बारा दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. आता पुन्हा अस्मानी संकटाने बळीराजाच्या चिंतेत भर घातली आहे. या पावसाने लाख, लाखोरी, उडीद, हरभरा या कडधान्य पिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही ठिकाणी उघड्यावर ठेवलेली शेकडो धानाची पोती ओली झाली.

Nagpur | पालकमंत्री राऊतांनी घेतला बुस्टर डोज; आणखी कोणकोण आहेत बुस्टरसाठी फ्रंटलाईनवर?

corona | नागपुरात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या हजाराच्या उंबरठ्यावर; एनडीआरएफच्या जवानांनाही लागण!

Follow Us