Nana Patekar : नाना पाटेकर यांनी 1.50 कोटीची कार विकत घेतली नाही, पण तेच पैसे त्यांनी..प्रसिद्ध लेखकाने सांगितली नानांच्या स्वभावाची दुसरी बाजू
Nana Patekar : 1996 साली आलेल्या 'अग्निसाक्षी' चित्रपटात रणबीर पूष्प यांनी नाना पाटेकरांसोबत काम केलं होतं. 'अग्निसाक्षी' नाना पाटेकरांच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. नाना पाटेकरांबद्दल अनेकांचा गैरसमज आहे असं रणबीर पूष्प यांचं मत आहे.

मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट आणि हिंदी सिने सृष्टीमध्ये आज नाना पाटेकरांचं एक वेगळं स्थान आहे. नाना पाटेकरांची एक वेगळी ओळख आहे. त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. नाना पाटेकर हे उत्तम अभिनेते आहेतच. पण त्यांना सामाजिक विषयांची सुद्धा तितकीच जाण आहे. एक माणूस म्हणून नाना पाटेकरांबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. नाना पाटेकर आक्रमक स्वभावाचे, गरम डोक्याचे म्हणूनही ओळखले जातात. हिंदी सिने सृष्टीतील त्यांच्या वादांचीही भरपूर चर्चा होते. 1989 साली ‘परिंदा’च्या सेटवर दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेते पटकथा लेखक रणबीर पूष्प यांनी नाना पाटेकरांच्या स्वाभावाची दुसरी बाजू सांगितली आहे. 1996 साली आलेल्या ‘अग्निसाक्षी’ चित्रपटात रणबीर पूष्प यांनी नाना पाटेकरांसोबत काम केलं होतं. ‘अग्निसाक्षी’ नाना पाटेकरांच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे.
नाना पाटेकरांबद्दल अनेकांचा गैरसमज आहे असं रणबीर पूष्प यांचं मत आहे. ‘लोकांनी नाना पाटकेरांबद्दल चुकीचं मत बनवून घेतलं आहे’ असं सिद्धार्थ कनन सोबतच्या मुलाखतीत रणबीर पूष्प म्हणाले. शेतीच्या दुरावस्थेमुळे टोकाचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल नाना पाटेकर यांच्या मनात वेदना होती. त्यासाठीच त्यांनी केलेल्या कामाचा दाखला पूष्प यांनी दिला. शेतकऱ्याची स्थिती पाहून नाना पाटेकरांनी दीड कोटीची कार विकत घेण्यास नकार दिला. तेच पैसे त्यांनी शेतकरी कुटुंबांना दिले असं रणबीर पूष्प म्हणाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. ते का कुणाचं नुकसान करतील असं पूष्प म्हणाले.
नाना पाटेकर रागावतात हे मान्य पण..
‘नाम’ या संस्थेची स्थापना करुन त्या माध्यमातून येणारा निधी ते शेतकऱ्यांसाठी वापरत आहेत. ते स्वत: शेतात राहतात असं पूष्प यांनी सांगितलं. नाना पाटेकर यांचा संयम सुटतो, त्यांना राग येतो हे पुष्प यांनी मान्य केलं. पण त्यांच्या रागावण्यामागे काहीतरी कारण असतं हे सुद्धा पूष यांनी सांगितलं. नानांनी एकदा धावत्या कारमधून कोणीतरी प्लास्टिक बॉटल बाहेर टाकल्याचं पाहिलं. त्यांनी कार थांबवली, ती बॉटल उचलली. ट्रॅफिक सिंग्नलजवळ त्यांनी बॉटल बाहेर फेकणाऱ्या कार चालकाला थांबवलं. त्यांनी कार चालकाला तिथेचं असलेलं महात्मा गांधींच होर्डिंग दाखवलं. त्यावर लिहिलेला स्वच्छ भारताचा संदेश दाखवून त्याला समजावलं.
